Union Budget 2023 : हा बजेट शब्द आला कुठून? देशात पहिल्यांदा कोणी सादर केला अर्थसंकल्प

| Updated on: Jan 19, 2023 | 6:54 PM

Union Budget 2023 : बजेट शब्दाचा इतिहास काय? शब्द आला तरी कुठून, जाणून तरी घ्या.

Union Budget 2023 : हा बजेट शब्द आला कुठून? देशात पहिल्यांदा कोणी सादर केला अर्थसंकल्प
Follow us on

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील हे शेवटचे पूर्ण बजेट ठरेल. पुढील वर्षी, 2024 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहे. लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 112 अंतर्गत केंद्र सरकारला आर्थिक वर्ष (Financial Year) सुरु होण्यापूर्वी अर्थसंकल्प सादर करावा लागतो.

केंद्रीय अर्थसंकल्प हा कोणत्याही वर्षासाठीची कमाई आणि खर्च यांचा आढावा घेणारा दस्ताऐवज असतो. आर्थिक वर्षे दरवर्षी 1 एप्रिल रोजी सुरु होते आणि पुढील वर्षी 31 मार्च रोजी समाप्त होते. देशात केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा 19 व्या शतकात सुरु झाली.

बजेट फेंच्र भाषेतील ‘Bougette’ या शब्दापासून घेण्यात आला आहे. याचा अर्थ छोटी पिशवी, बॅग असा होतो. देशाचा पहिला अर्थसंकल्प इंग्रजांच्या काळात सादर करण्यात आला होता. स्कॉटिश अर्थशास्त्री आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी हा मान आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने त्यांनी ब्रिटनच्या राणीसमोर हा अर्थसंकल्प सादर केला होता.

हे सुद्धा वाचा

ब्रिटिश क्राऊन समोर भारताचे पहिले बजेट 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आले होते. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सुरुवातीच्या 30 वर्षांमध्ये यामध्ये पायाभूत सुविधा सारख्या शब्दांचा समावेश नव्हता. बजेटमध्ये 20 शतकाच्या सुरुवातीला या शब्दाचा समावेश करण्यात आला.

स्वतंत्र भारताचे पहिले बजेट 16 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आले. देशाचे पहिले अर्थमंत्री आर. के. षणमुख चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थात हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एकप्रकारे आढावा होता. त्यामध्ये आजच्या सारख्या सर्वच क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद नव्हती.

देशाच्या पहिल्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारच्या नवीन कराची घोषणा करण्यात आली नव्हती. या अर्थसंकल्पात 46% म्हणजे जवळपास 92.74 कोटी रक्कम ही संरक्षण सेवांवर खर्च करण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानसोबत काश्मिरवरुन युद्ध झाले होते.

भारताच्या अर्थसंकल्पाची संकल्पना प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी मांडली. स्वतंत्र भारताच्या अर्थसंकल्पाची संकल्पना त्यांनी तयार केली होती. ते भारतीय शास्त्रज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ होते.ते भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य पण होते.

देशाचे केंद्रीय बजेट 1950 मध्ये लोकसभेत सादर होण्यापूर्वीच फुटले होते. तेव्हापासून बजेट छापण्याचे काम राष्ट्रपती भवनाजवळील मिंटो रोडवरील एका प्रेसमधून सुरु झाले. त्यानंतर अर्थसंकल्प छापण्याचे काम 1980 मध्ये नॉर्थ ब्लॉकमधील सरकारी प्रेसमधून करण्यात आले.

पहिल्या अर्थसंकल्पाची सर्व कागदपत्रे केवळ इंग्रजीत छापण्यात येत होती. 1955-56 मध्ये ही कागदपत्रे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये छापण्यात येऊ लागली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पहिल्यांदा डिजिटल बजेट सादर केले होते. कोरोना काळात हे बजेट सादर करण्यात आले होते.