परभणी : स्पर्धा परीक्षांमुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. परभणी जिल्ह्यात (Parabhani Crime) पालम तालुक्यातील भोगाव येथे हा प्रकार घडला. किशन घनश्याम ढगे असं मयत तरुणाचं नाव आहे. नैराश्य, आर्थिक अडचण यावर मात करत, मोठ्या पदावर काम करण्याचे स्वप्न असूनही शिपाई पदावर काम करताना होणारी घुसमट, या कारणाने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. 8 एप्रिल रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील नागझरी येथे गळफास घेत त्याने जीवनयात्रा संपवली.
किशन ढगे हा भोगाव (ता. पालम, जि. परभणी) येथील रहिवासी होता. मागील 10 वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या स्पर्धेत येणारे अपयश, स्पर्धा परीक्षांमध्ये सतत होणारे घोटाळे उघडकीस येत असल्याने तो निराश झाला होता.
मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न असूनही त्याला शिपाई पदावर काम करताना अपमान वाटायचा. त्यामुळे तो नैराश्यात सापडला. यातच घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. शिक्षणासाठी बँक आणि खासगी लोकांकडून घेतलेले कर्ज फेडताना त्याची दमछाक होत होती. या कारणाने कंटाळून अखेर त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचा दावा केला जात आहे.
सध्या तो नागझरी (जि. वर्धा) येथे शिपाई म्हणून कार्यरत होता. ती नोकरी करत असतानाच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन उच्च पदावर जाण्याचा त्याचा मानस होता. त्याच्या बरोबरीचे गावाकडील मित्र स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन मोठ्या पदावर पोचले होते. त्यामुळे निराशेने ग्रासले होते. त्यामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला
पशुवैद्यकीय दवाखानामध्ये कार्यरत त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पार्थिवावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी किसन ढगेच्या आत्महत्येबद्दल ट्विटरवरुन संताप व्यक्त केला आहे.
म्हाडा तसेच इतर स्पर्धा परीक्षेत होत असलेल्या घोटाळ्यांना, परीक्षांतील विलंब व पदभरतीतील ढिसाळ कारभाराला वैतागून किसन घनश्याम ढगे या MPSC च्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही बाब प्रचंड संतापजनक आहे. @Mpsc_Andolan @OfficeofUT @Awhadspeaks @AjitPawarSpeaks pic.twitter.com/ho1AjkgNFr
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) April 11, 2022
संबंधित बातम्या :
एसटी कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, मुंबईवरुन परतलेल्या कर्मचाऱ्याची हिंगोलीत आत्महत्या
सततच्या आजारपणाचा वैताग, अंबरनाथमध्ये ज्येष्ठ नागरिकाचं टोकाचं पाऊल
प्रेयसीच्या आईने खडसावलं, बदनामीच्या भीतीने 21 वर्षीय प्रियकराची आत्महत्या