कोलकाता : आपल्याला ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका ठाऊक आहे. या मालिकेतील देवी सिंग हा काही लोकांची हत्या करुन गुन्हा नष्ट करण्यासाठी मृतकांना जमीनीत पुरतो, हे आपण बघितलं आहे. हे सगळं एका मालिकेत घडलं आहे. पण पश्चिम बंगालमध्ये अशीच काहीशी घटना थेट वास्तव्यात घडली आहे. एका तरुणाने त्याच्याच कुटुंबातील सदस्यांची हत्या केली. त्यानंतर सर्वांचे मृतदेह घराजवळच जमिनीखाली पुरले. ही घटना समोर आल्यानंतर पश्चिम बंगाल राज्य हादरलं आहे. तरुणाने इतकं वाईट कृत्य का केलं? असा प्रश्न अनेकांना पडत आहे (youth murder his family in west bengal).
आपल्या कुटुंबाची हत्या करुन घराजवळ जमिनीत पुरणाऱ्या आरोपीचं नाव आसिफ मोहम्मद असं आहे. तो 19 वर्षांचा आहे. त्याने घरातील आई-वडील, मोठी बहीण, आजी यांची हत्या केली. त्याने या सर्वांची हत्या केली तेव्हा त्याचा मोठा भाऊ घरात नव्हता. तो काही कामानिमित्ताने बाहेर गेला होता. चार महिन्यांनी त्याचा भाऊ घरी आला तेव्हा त्याला संबंधित घटनेची माहिती मिळाली. त्याने तातडीने मालदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्याने आपल्या भावाच्या कृत्याची माहिती दिली (youth murder his family in west bengal).
पोलिसांनी घटनेचं गांभीर्य जाणून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराजवळ खोदकाम केलं तर तिथे खरंच काही मृतदेह आढळले. पोलिसांनी तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी आसिफने आपला गुन्हा केला. त्याने फेब्रुवारी 2021 मध्ये हे कृत्य केलं. त्याने सुरुवातीला जेवणात गुंगीचं औषध टाकलं. त्यानंतर सर्वांचा गळा दाबून हत्या केली. आरोपीने नंतर घराजवळ सर्व मृतदेह पुरले.
आरोपीने इतकं टोकाचं कृत्य का केलं? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यात आहे. याशिवाय आरोपीच्या मोठ्या भावाने घटनेच्या चार महिन्यानंतरच पोलीस ठाण्यात धाव का घेतली? की तो देखील या कृत्यात सहभागी होता? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आरोपीची कसून चौकशी केली जाणार आहे. पोलीस लवकरच आरोपीला कोर्टात हजर करणार आहेत.
हेही वाचा : मनोरुग्ण मुलाची पालकांना अमानुष मारहाण, आईचा मृत्यू, व्हिडीओ काढण्यात बघे दंग