तुकडे-तुकडे गँगची फाईल का दाबून ठेवली? दिल्लीतील पहिल्याच सभेत फडणवीसांचा केजरीवालांवर हल्लाबोल

| Updated on: Jan 29, 2020 | 1:47 PM

जर तुम्ही देशाबरोबर असाल तर तुम्ही देशाचे तुकडे-तुकडे करु इच्छिणाऱ्या आरोपींच्या खटल्याच्या फाईल का दाबून ठेवल्या आहेत? असा प्रश्न फडणवीसांनी केजरीवालांना विचारला

तुकडे-तुकडे गँगची फाईल का दाबून ठेवली? दिल्लीतील पहिल्याच सभेत फडणवीसांचा केजरीवालांवर हल्लाबोल
Follow us on

नवी दिल्ली : देशाचे तुकडे-तुकडे करण्याची इच्छा असणाऱ्यांविरोधात खटला चालवण्याची परवानगी का देत नाही? आठ महिन्यांपासून फाईल का दाबून ठेवली आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर (Devendra Fadnavis Slams Arvind Kejriwal) केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या सभेत फडणवीसांनी शाहीन बाग प्रकरणावरुनही केजरीवाल सरकारवर टीकास्त्र सोडलं.

‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाहता, देश पोकळ करण्यासाठी कट रचला जात असल्याचं दिसत आहे. शारजील इमाम नावाच्या व्यक्तीने ‘आम्ही 5 लाख लोकांना एकत्र करु आणि आसामला भारतापासून वेगळे करु, पाच लाख लोकांना एकत्र करुन ईशान्येकडील राज्यांना भारताला तोडणार आहोत, अशी भाषा केल्याचं फडणवीस म्हणाले.

‘जर तुम्ही देशाबरोबर असाल तर तुम्ही देशाचे तुकडे-तुकडे करु इच्छिणाऱ्या आरोपींच्या खटल्याच्या फाईल का दाबून ठेवल्या आहेत? ही फाईल तुमच्याकडे आठ महिन्यांपासून पडून आहे, मग तुम्ही देशद्रोह्यांवर कारवाईची परवानगी का देत नाही?’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांनी ‘आम आदमी पक्षा’ने विकासाचं राजकारण केलं नाही. त्यांनी फक्त केंद्र सरकारच्या योजना दिल्लीमध्ये लागू होणार नाहीत याची काळजी घेतली, असा घणाघातही फडणवीसांनी केला. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये ‘आयुष्यमान भारत’ योजना लागू होऊ दिली नाही. तसंच पंतप्रधान आवास योजनाही लागू होऊ दिली नाही. गरिबांना घरं आणि चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत, असं केजरीवालांना वाटत नाही का? असे प्रश्नही फडणवीसांनी विचारले. राजधानी दिल्लीतील देवली विधानसभा मतदारसंघात काल देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली.

दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे 10 दिग्गज नेते दिल्ली विधानसभेच्या प्रचारात उतरणार आहेत. दिल्लीतील चौका-चौकात महाराष्ट्रातील नेत्यांच्या सभा होणार आहेत. देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis Slams Arvind Kejriwal) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या दिग्गज नेत्यांच्या सभा दिल्लीत आयोजित करण्यात आल्या आहेत.