Special Story | कोरोना, शाळा आणि भीषण वास्तव…

| Updated on: Jan 09, 2021 | 7:01 PM

कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय जे कधीही न भरुन येणारं आहे. अनेक लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली होती. शिक्षणाकडे उद्याचं भविष्य म्हणून पाहिलं जाते.

Special Story | कोरोना, शाळा आणि भीषण वास्तव...
Follow us on

मुंबई : कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय जे कधीही न भरुन येणारं आहे. अनेक लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली होती. शिक्षणाकडे उद्याचं भविष्य म्हणून पाहिलं जातं मात्र, कोरोनाच्या या कठीण काळात जगणं मुश्कील होतं तिथं शिक्षणाची काय कथा होती. अत्यावश्यक सेवेतील लोक सोडली तर सगळ्यांनाच घरात बंदिस्त रहावं लागलं. साहजिकच लाखो मुलांना शाळेत जाता आलं नाही. पर्यायाने काही महिने शिक्षणापासून वंचित रहावं लागलं.कोरोनामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले होते. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे पालकांना वाटत होते तर कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक अडचणींनी त्यांना ग्रासलं होतं. आता कुठेतरी परिस्थिती सुधारत आहे. (Special report on The reality of schools in the period of Corona)

मात्र, जरी परिस्थितीत सुधारत असली तरी शैक्षणिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. हातावर पोट असलेल्या लोकांची मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. मात्र, दुसरीकडे श्रीमंतांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहिले त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॅाप, टॅब अशा प्रकारची साधने होती. यामुळे आता एक भिती निर्माण झाली आहे. ती म्हणजे जे मुले कोरोनाच्या काळात जवळपास 8 ते 9 महिने शिक्षणापासून दूर गेली. ते मुले परत शिक्षणाकडे पूर्वीप्रमाणे वळतील का?

आता देशामध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून बऱ्याच ठिकाणी शाळा देखील सुरु झाल्या आहेत. मात्र, आता पालक कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार होत नाही. जिल्हा परिषद शिक्षक, खासगी शाळेतील शिक्षक, आदिवाशी शाळेतील शिक्षक, खासगी संस्थेतील शिक्षक व इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षक या सर्वांसोबत चर्चा केली ती म्हणजे कोरोनानंतर शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अभ्यास… कारण भारतामध्ये कोरोनाचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी देखील कोरोना अजूनही हद्दपार झालेला नाही. यामुळे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत उत्साही नाहीत आणि शाळा जरी सुरु झाल्या असतील तरी विद्यार्थी अभ्यासात मागे तर पडले आहेत. त्यांचा हा एवढा मोठा गॅप कसा भरुन काढायचा हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा आहे.

ग्रामीण आणि शहरी मुलांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची पुसटशी रेषा

कोरोनाच्या परिस्थितीत शाळा संपूर्णपणे बंद झाल्या. मात्र, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु झाले. पण ग्रामीण भागातील विद्यार्थांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी कुठलेही साधन नव्हते. त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॅाप अथवा टॅब हे तर दूरचंच…. काही गावांमध्ये तर मोबाईलला रेंज देखील नाही. अशा सर्व परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण घेतले असेल याची कल्पना आपल्याला करता येईल. मात्र, दुसरीकडे शहरी भागातील विद्यार्थ्यांनाकडे सोईसुविधा असल्यामुळे त्यांचे ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे सुरु होते. याच काळात ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये एक पुसटशी रेषा निर्माण झाली आहे.

शाळा तर सुरु झाली, पुढच्या समस्या कोणत्या?

कोरोनावर मात करुन आपण शाळा पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत हा आनंद व्यक्त करणे चुकीचे ठरेल कारण जरी शाळा सुरु झाल्या असतील तरी अनेक मोठ्या समस्या आपल्या पुढे उभ्या आहेत. कारण अजूनही कोरोनाचे संकट गेले नाही. शाळांमधून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था कशी आहे, त्यांचा जो वेळ व्यर्थ केली त्याची भरपाई कशी करता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे.

(Special report on The reality of schools in the period of Corona)