बंगाल-आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील तोफा थंडावणार; वाचा, कुणाचं किती पारडं जड!

| Updated on: Mar 25, 2021 | 1:49 PM

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. (Campaigning for first phase in West Bengal, Assam ends today)

बंगाल-आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील तोफा थंडावणार; वाचा, कुणाचं किती पारडं जड!
narendra modi- Mamata Banerjee
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. शनिवारी या दोन्ही राज्यात पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. बंगालमध्ये 30 जागांवर 191 उमेदवार उभए आहेत. तर आसाममध्ये 47 जागांवर 267 उमेदवार उभे आहेत. बंगालमध्ये टीएमसी सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर आसाममधील सत्ता वाचवण्याची भाजपची धडपड सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने या राज्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. (Campaigning for first phase in West Bengal, Assam ends today)

बंगालमधील पाच जिल्हे 30 जागा

बंगालच्या बांकुडा, पुरुलिया, झारग्राम, पश्चिम आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यात 30 जागांवर शनिवारी मतदान होणार आहे. जंगल महल म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात आदिवासी समाजाची व्होटबँक मोठी आहे. हा भाग डाव्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत या भागात टीएमसीने विजय मिळवला आहे. दरम्यान, 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने टीएमसीच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे या 30 जागांवर कुणाचं वर्चवस्व राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात काय?

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 30 जागांवर मतदान होणार आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने या मतदारसंघांमध्ये जवळपास क्लिन स्वीप केलं होतं. या 30 पैकी 27 जागांवर टीएमसीने विजय मिळवला होता. या ठिकाणी भाजपला खातंही खोलता आलं नव्हतं. तर दोन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. एका जागेवर रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीने विजय मिळवला होता. यावेळी निवडणुकीची समीकरणं अत्यंत वेगळी झाली आहे. गेल्या वेळी एकाही जागेवर विजयी न झालेल्या भाजपला यावेळी मोठा विजय मिळण्याची अपेक्षा आहे.

पहिल्या टप्प्यात व्हिआयपी

पुरुलिया मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या सुदीप मुखर्जी यांना भाजपने तिकीट दिलं आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रीतम बॅनर्जी आणि टीएमसीचे सुजय बॅनर्जी उभे आहेत. बांघमुंडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार नेपाल चंद्र महतो नशीब आजमावत आहेत. या मतदारसंघातून ते दोनदा विजयी झालेले आहेत. त्यांच्याविरोधात टीएमसीचे सुशांत महतो लढत असून भाजपने ही जागा एजेएसयूला सोडली आहे. एजेएसयूने आशूतोष महतो यांना तिकीट दिलं आहे. खडगपूर विधानसभा मतदारसंघ हा हायप्रोफाईल मतदारसंघ मानला जातो. भाजपे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी भाजपच्या तपन भुया यांच्या विरोधात टीएमसीचे दिनेन रॉय यांच्याच लढत होत आहे. मेदनीपूरमध्ये भाजपचे सामित कुमार दास आणि टीएमसीच्या उमेदवार जुने मलिहा आमनेसामने आहेत.

आसाममध्ये 47 जागांवर घमासान

आसाम विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 47 जागांवर मतदान होणार असून या ठिकाणी 267 उमेदवार मैदानात उतरले आहेत. यात हिंदू आसामी मतदारांसह चहांच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मतदारांचा समावेश असून त्यांची मते निर्णायक मानली जातात. आसामिया मतदार सीएए लागू करण्याच्या विरोधात आहेत. तर चहा मळ्यातील आदिवासी मतदार रोजंदारी वाढवून मिळत नसल्याने नाराज आहेत. मात्र, 2016मध्ये या दोन्ही घटकांना आपल्याकडे वळण्यात भाजप यशस्वी झाला होता. त्यामुळे राज्यात काँग्रेसचा सफाया झाला होता. त्यात आता भाजप यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Campaigning for first phase in West Bengal, Assam ends today)

दिग्गज मैदानात

आसाममध्ये अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल (माजुली), विधानसभा अध्यक्ष हितेंद्र नाथ गोस्वामी (जोरहाट), मंत्री रंजीता दत्ता (बेहाली) आणि संजय किसन (तिनसुकीया) आदी नेते निवडणूक लढवत आहेत. एनडीएचे सहयोगी आणि आसाम गण परिषदेचे नेते व मंत्री अतुल बोरा (बोकाखाट) आणि केशव महंत (कलियाबोर)मधून निवडणूक लढवत आहेत. तर, आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपून बोरा (गोहपूर), काँग्रेस विधीमंडळ दलाचे नेते देवव्रत सैकिया (नाजिरा) आणि काँग्रेसचे महासचिव भूपेन बोरा (बिहपुरिया)मधून निवडणूक लढवत आहेत. (Campaigning for first phase in West Bengal, Assam ends today)

 

संबंधित बातम्या:

भाजपच्या उमेदवार यादीतून मिथुनदा गायब, प. बंगाल विधानसभेचं तिकीट नाहीच

तामिळनाडूत कामराज, आसाममध्ये गोगोई आणि बंगालमध्ये प्रणवदा; वाचा, काँग्रेस नेत्यांना भाजपने कसे केले हायजॅक!

मोफत वीज, 5 लाख रोजगार, महिलांना 2 हजार रुपये; आसाममध्ये राहुल गांधींचा आश्वासनांचा पाऊस

(Campaigning for first phase in West Bengal, Assam ends today)