पश्चिम बंगालच्या रणधुमाळीतून गांधी कुटुंब दूर का?; भाजपला रोखण्यासाठी खेळी?

| Updated on: Mar 26, 2021 | 4:35 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. उद्या पहिल्या टप्प्यातील 30 जागांसाठी मतदान होणार आहे. (why gandhi family distance from election campaign in west bengal?)

पश्चिम बंगालच्या रणधुमाळीतून गांधी कुटुंब दूर का?; भाजपला रोखण्यासाठी खेळी?
mamata banerjee
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. उद्या पहिल्या टप्प्यातील 30 जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते डझनभर केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराचं रान उठवून दिलं होतं. पण या रणधुमाळीत काँग्रेसचा आवाज मात्र क्षीण दिसत होता. पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसल्या नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसच्या या खेळीमागे भाजपला रोखणं आणि ममता बॅनर्जींना फायदा पोहोचवणं हाच हेतू असल्याचं बोललं जात आहे. (why gandhi family distance from election campaign in west bengal?)

उद्या शनिवारी 27 मार्च रोजी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 30 जागांवर मतदान होणार आहे. मात्र, प्रचार संपला तरी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बंगालमध्ये फिरकले नाहीत. काँग्रेसने बंगालच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका यांची नावे होती. परंतु, प्रत्यक्षात हे तिन्ही स्टार प्रचारक बंगालमध्ये आलेच नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेस बंगालच्या निवडणुकांना महत्त्व देत नाही की यामागे काही खेळी आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

तिरंगी लढत नाहीच

पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात होतं. टीएमसी, भाजप आणि काँग्रेस-डावी आघाडी अशी ही लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, गांधी घराण्याने बंगालमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याने आता बंगालमध्ये फक्त दुहेरी लढत होत असल्याचं चित्रं आहे.

ममता बॅनर्जींना फायदा पोहोचवण्याची खेळी

कोणत्याही परिस्थितीत बंगाल भाजपच्या हाती जाऊ नये म्हणून गांधी कुटुंबाने प्रचारात भाग घेतला नाही. प्रचारात भाग न घेता ममता बॅनर्जींना काँग्रेसने मोकळं रान करून दिलं आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदारांना जो मेसेज जायचा तो गेला असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या अनपेक्षित खेळीमुळे भाजपची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. तिरंगी लढत झाली असती तर काँग्रेस आणि टीएमसीच्या मतांमध्ये विभागणी झाली असती. त्याचा फायदा भाजपलाच झाला असता, असं भाजपला वाटत होतं. पण काँग्रेसच्या खेळीने भाजपला टेन्शन दिलं आहे.

6 एप्रिलनंतर प्रचार

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सर्व फोकस आसामच्या निवडणुकीवर केला आहे. आसामच्या निवडणुका संपल्यानंतर 6 एप्रिलपासून राहुल आणि प्रियांका बंगालमध्ये निवडणूक प्रचार करणार असल्याचं बंगालचे काँग्रेसचे नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी सांगितलं. मात्र. तोपर्यंत बंगालमध्ये तीन टप्प्याच्या निवडणुका झालेल्या असतील. म्हणजे 91 जागांवर मतदान झालेलं असेल आणि त्याचा थेट फायदा टीएमसीलाच झालेला असेल, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. शेवटच्या टप्प्यात निवडणूक प्रचाराला येणं हा केवळ काँग्रेसचा दिखावा असेल असंही सूत्रांचं म्हणणं आहे. (why gandhi family distance from election campaign in west bengal?)

 

संबंधित बातम्या:

 ‘मला हिंदू धर्म शिकवू नका, मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी’, ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

मोदी बांगलादेशच्या दौऱ्यातून बंगाल, आसामचे सत्ता समीकरण साधणार?; वाचा, सविस्तर

प्रत्येक कुटुंबाला हेलिकॉप्टर, दरवर्षी एक कोटी देणार, चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराची आश्वासनांची खैरात

(why gandhi family distance from election campaign in west bengal?)