Ajay Devgn: “एखादी वाईट घटना घडली की संपूर्ण फिल्म इंडस्ट्री वाईट ठरते”; अजय देवगणने व्यक्त केली नाराजी

| Updated on: Apr 27, 2022 | 2:56 PM

बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी 'रनवे 34' (Runway 34) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह, बोमन इराणी आणि अमिताभ बच्चन यांच्याही भूमिका आहेत.

Ajay Devgn: एखादी वाईट घटना घडली की संपूर्ण फिल्म इंडस्ट्री वाईट ठरते; अजय देवगणने व्यक्त केली नाराजी
Ajay Devgn
Image Credit source: Facebook
Follow us on

बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी ‘रनवे 34’ (Runway 34) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह, बोमन इराणी आणि अमिताभ बच्चन यांच्याही भूमिका आहेत. येत्या 29 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अजय त्याच्या बॉलिवूडमधील (Bollywood) इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल व्यक्त झाला. आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याला किती त्याग करावे लागले, याबद्दल त्याने सांगितलं. इतकंच नव्हे तर ट्रोलिंगच्या भीतीने सेलिब्रिटी आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलू शकत नाहीत असंही तो म्हणाला.

“..म्हणून आम्ही मोकळेपणे मतं मांडू शकत नाही”

रणवीर अलाहबदियाला दिलेल्या एका मुलाखतीत अजय म्हणाला, “बर्‍याच गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला सतत तुमच्या वजनाबद्दल जागरूक राहावं लागतं, अनेकदा तुम्ही तुमच्या मनातलं मोकळेपणे बोलू शकत नाही. देशात बर्‍याच गोष्टी घडतात आणि त्या घटनांवर आम्ही बोलतो किंवा मौन बाळगण्याचा पर्याय निवडतो. कारण आमच्या मतांकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. जरी तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असाल तरी ते वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. लोकांचा एक संघ तुमच्यासोबत असेल आणि आणखी एक मोठा संघ तुमच्यासोबत नसेल आणि तुम्हाला याची भीती वाटू लागते.”

“एका व्यक्तीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला दोष देतात”

“लोकांना असं वाटतं की हे सेलिब्रिटी शांत का आहेत आणि घडणाऱ्या घडामोडींबद्दल काहीच का बोलत नाहीत. कारण आम्ही काहीही बोललो तरी त्यावर लोकांची प्रतिक्रिया असते. तुम्ही चांगलं म्हणाल तरी ऐकावं लागतं आणि वाईट म्हणाल तरी ऐकावंच लागतं. इंडस्ट्रीत जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा, उदाहरणार्थ अमूक व्यक्ती काही म्हणाली तर इतरांच्या मते संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीच वाईट आहे. इंडस्ट्रीत असं घडतं का, असा प्रश्न लोकांना पडतो. पण असं नाहीये. जेव्हा तुम्ही एखादा वर्तमानपत्र वाचाल, तेव्हा अमूक एक व्यक्ती गुन्हा करताना पकडली जाते तेव्हा त्या व्यक्तीशी संबंधित इंडस्ट्रीला कोणी दोष देत नाही. ते त्या व्यक्तीलाच दोष देतात परंतु आमच्यात एकच व्यक्ती संपूर्ण इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करत असते. कदाचित ती व्यक्ती इंडस्ट्रीचा भागही नसेल, तो तथाकथित अभिनेता किंवा स्ट्रगलर असेल पण तरी लोक म्हणतील की अभिनेत्याने असं केलं,” असं तो पुढे म्हणाला. अनेकदा विनाकारण फिल्म इंडस्ट्रीला दोष दिला जातो, असं अजय यावेळी म्हणाला.

अजयने 1991 मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘दिलवाले’ (1994), ‘इश्क’ (1997), ‘हम दिल दे चुके सनम’ (1999), ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ यासह अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. लवकरच तो ‘रनवे 34’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2015 मध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.