‘पोपटा’पासून ते ‘आंटीची वाजवली घंटी’पर्यंतची हिट लोकगीतं कुणी लिहिलीय माहित्ये का?; एकदा वाचाच!

| Updated on: Mar 30, 2021 | 5:10 PM

महाराष्ट्राला लोकगीतं, भक्तीगीतं, कोळीगीतांची फार जुनी परंपरा आहे. (know about manvel gaikwad and his famous marathi songs)

पोपटापासून ते आंटीची वाजवली घंटीपर्यंतची हिट लोकगीतं कुणी लिहिलीय माहित्ये का?; एकदा वाचाच!
गायक, गीतकार मानवेल गायकवाड
Follow us on

मुंबई: महाराष्ट्राला लोकगीतं, भक्तीगीतं, कोळीगीतांची फार जुनी परंपरा आहे. आजही ही गीतं ऐकायला श्रवणीय वाटतात. परंतु, ही गाणी लिहिणारे कवी, गीतकार फारसे कुणाला माहीत नसतात. आता हेच पाहा ना, ‘जवा नवीन पोपट हा…’ ‘काल रात्री या आंटीची, जवा घंटी मी वाजवली…’ ‘मी बाबुराव बोलतोय…’ ही गाजलेली गाणी आजही आपल्या ओठांवर असतात. पण या गाण्याचा गीतकार मात्र आपल्याला आठवत नसतो. ही अस्सल आणि बावनकशी गीते आहेत मानवेल गायकवाड यांच्या लेखणीतून उतरलेली. जाणून घेऊया या गीतकाराविषयी… (know about manvel gaikwad and his famous marathi songs)

कुठून कुठे?

लोकगीतांना नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या मानवेल गायकवाड यांचे संपूर्ण नाव मानवेल अगस्तीन गायकवाड. गायकवाड हे मूळचे अहमदनगरचे. त्यांचा जन्म इगतपुरीच्या पोर्टर चाळीत झाला. हे त्यांचं आजोळ. त्यांच्या आजोबा म्हणजे आईचे वडील होनाभाऊ जगताप हे रेल्वेत नोकरीला होते. मानवेल गायकवाड यांचं बालपण आजोळी इगतपुरी आणि कल्याणला गेलं. सुरुवातीला ते कल्याण पश्चिमेला छाया टॉकिजजवळ असलेल्या ब्रेकसमेन चाळीत राहायचे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या चाळी आजही अस्तित्वात आहेत. वडील रेल्वेत नोकरीला असल्याने ते या चाळीत राहायला आले होते. सध्या ते कल्याण पूर्वेला असलेल्या आनंदवाडीत राहतात.

मामांचे संस्कार

मानवेल गायकवाड यांचे मामा मायकेल जगताप हे गायक होते. ते ख्रिस्ती भजन गायचे. आजोळी आल्यावर मानवेल हे मामांसोबतच राहायचे. त्यांची भजने तन्मयतेने ऐकायचे. मामांबरोबर त्यांचा हार्मोनियम उचलणारे मानवेल पुढे हार्मोनियमवरून सराईतपणे बोटेही फिरवू लागले. त्यावेळी ते 12 वर्षाचे होते. त्यांचं शिक्षणही सुरू होतं. कल्याण पश्चिमेकडील लुड्स इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. तर बिर्ला कॉलेजमधून 12 पर्यंत शिक्षण घेतलं. पुढे रेल्वेत लाईनमन म्हणून नोकरीला लागेल आणि गाण्याच्या छंदापायी ही नोकरीही सोडली.

गाण्यासाठी धाडसी निर्णय

मानवेल गायकवाड यांनी गाण्यासाठी नोकरी सोडली. ते रेल्वेत नोकरीला होते. पण गाण्याचे कार्यक्रम आणि नोकरी दोन्ही सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यातच कामावर उशिरा गेल्यावर अधिकारी वर्ग फैलावर घ्यायचा. त्यामुळे त्यांनी अखेर वैतागून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेताना त्यांना सारासार विचार केला. कारण अनेक कलावंतांची झालेली वाताहत त्यांनी पाहिली होती. त्यामुळे त्यांनी सर्व विचार करून धाडसी निर्णय घेतला आणि नंतर संगीत, गायन आणि गीत लेखन यावरच भर दिला. त्यातूनच त्यांनी त्यांच्या आर्थिक विवंचनेवर मात केली.

गायकवाडांची गाजलेली गाणी

आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं
तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं
शेजारचीही काळी मैना
लागली डोलायला
जवा नवीन पोपट हा,
लागला मिठू मिठू बोलायला

आणि

हॅलो… मी बाबुराव बोलतोय
हॅलो… मी बाबुराव बोलतोय

काय बोलू बरं तू बोलल्यावरं
जीव माझा फुलावानी फुलतोय
हॅलो… मी बाबुराव बोलतोय…

आणि

आजच माझा झालाय पगार
देईन रोख नको उधार
गोष्ट पटली, झटकन उठली
अशी प्रथा मी गाजवली,
अहो रात्री या आंटीची
जेव्हा घंटी मी वाजवली…

आणि

येड्याच्या खेड्याला, अडाणी गड्याला,
सांगते इथून सटका, नाही तर डिस्कोचा दावीन झटका…

आणि

गेली माझी सख्खी बायको गेली
गेली माझी सख्खी बायको गेली…

आणि

नका नका दादा, सवाल ताजा
ठरवू तारीखं, नका हो ठरवू तारीखं
ही पोर लई बारीकं,
जळी वाळलेली खारीकं…

आणि

चारचौघात लागलंय लगीनं
चल बिगीनं फिराया जोडीनं

आणि

नुसते हालवायचे हातपाय
याला डिस्को म्हणायचे काय?…

आणि

बोल भीमाचा ध्यानी घ्यावा
घरोघरी आंबेडकर व्हावा
बोध हा प्रत्येकाने घ्यावा
भीमाच्या सारखा बाळ जन्मा यावा… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about manvel gaikwad and his famous marathi songs)

संबंधित बातम्या:

‘हॅलो, मी बाबुराव बोलतोय…’ हे गाणं विठ्ठल उमपांकडे कसं आलं?, आधी कुणी गायलं?; वाचा, मजेदार किस्सा!

‘गेली माझी सख्खी बायको गेली…’ या गाण्यात खट्याळपणा येत नव्हता; मग काय झालं?, वाचा!

आंटीच्या अड्डयावर रेड पडली अन् ‘आंटीची घंटी’ सूचलं; वाचा, नादावणाऱ्या गाण्याचा किस्सा

(know about manvel gaikwad and his famous marathi songs)