दादा कोंडके म्हणाले, ‘तुमची गाणी मला द्या, हवं तेवढं मानधन घ्या’; मग काय झालं?, वाचा!

| Updated on: Mar 31, 2021 | 4:19 PM

गायक, गीतकार मानवेल गायकवाड यांच्या पोपटाच्या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. (when manvel gaikwad met dada kondke, read what happened?)

दादा कोंडके म्हणाले, तुमची गाणी मला द्या, हवं तेवढं मानधन घ्या; मग काय झालं?, वाचा!
manvel gaikwad
Follow us on

मुंबई: गायक, गीतकार मानवेल गायकवाड यांच्या पोपटाच्या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यांच्या इतरही गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. खेड्यापाड्यात तर प्रत्येक लग्नात मानवेल गायकवाड यांची गाणी हमखास वाजत होती. त्यांची ही लोकप्रियता पाहून प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांनी गायकवाड यांना भेटायला बोलावलं होतं. काय झालं होतं या भेटीत? वाचा त्याचा किस्सा… (when manvel gaikwad met dada kondke, read what happened?)

दादा म्हणाले…

मानवेल गायकवाडांची गाणी हिट झाली होती. खेड्यापाड्यात या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. लग्न तिथे ‘पोपटा’चं गाणं हे जणू समीकरणच झालं होतं. त्यावेळचा एक किस्सा गायकवाड यांनी सांगितला. ‘प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांनी मला भेटायला बोलावलं होतं. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्यासोबत मी दादांना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा दादांनी, तुमची सर्व गाणी मला द्या, तुमचं नाव देणार नाही. हवं तेवढं मानधन घ्या, असं सांगितलं’, असं गायकवाड म्हणाले. ‘दादांच्या अनपेक्षित प्रस्तावाने मीही गोंधळून गेलो होतो. पण, गाण्याला नावच देणार नसाल तर पैसा तरी कशाला हवा?, असं सांगून मी दादांचा हा प्रस्ताव नाकारला. आज या गोष्टीचं अजिबात शल्य वाटत नाही, उलट अभिमान वाटतो’, असं गायकवाड सांगतात.

खेबुडकरांनी पाठ थोपाटली

गायकवाडांच्या पोपटाच्या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मराठी सिनेमा जगतातही गायकवाड नावाची हवा झाली होती. त्यातूनच त्यांच्याकडे ‘हिरवा चुडा’ हा चित्रपट आला. या चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकारांबरोबर गाणी लिहिली. या चित्रपटातून मला वगळण्याचा अतोनात प्रयत्न झाला. मात्र निर्मात्याचा आग्रह आणि लेखनीच्या बळावर मला या सिनेमासाठी गाणी लिहिण्याची संधी मिळाली.

मिळेल पैसा, मिळवाल कैसा, मिळेल सारं काही,
पण आईसारखं दैवत मिळणार नाही…

हे गाणं त्यांनी ‘हिरवा चुडा’साठी लिहिलं. या गाण्याच्या ओळी ऐकून जगदीश खेबुडकरांनी त्यांची पाठ थोपाटली होती.

अन् वामनदादांनी मिठीच मारली

गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माईसाहेब म्हणजे सवितामाई आंबेडकर यांच्यावर गाणं लिहिलं होतं. माईसाहेबांवर गाणं लिहिणारे दलित समाजातील ते पहिलेच गीतकार आहेत. बाबासाहेब तुटलेल्या कानाच्या कपाने चहापित आहेत, हे पाहून माईसाहेबांना काय वाटलं असेल आणि त्याला बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं असेल… या कल्पनेवर हे गीत आधारीत होते.

पाहून या कपाला, का हसते सविता,
वदले त्यावेळी भीमराज हा माझा,
आहे गं दुबळा समाज…

हे त्या गाण्याचे बोल होते. हे गाणं ऐकून प्रसिद्ध कवी, गीतकार वामनदादा कर्डक यांनी गायकवाड यांना मिठीच मारली. हा फार मोठा कवी होईल, अशी भविष्यवाणीही वामनदादांनी त्यावेळी केली होती, हा किस्सा सांगताना गायकवाड भारावून जातात.

पाच हजाराच्यावर गाणी

गायकवाड यांनी पाच हजाराच्यावर गाणी लिहिली आहेत. त्यांची गाणी सिनेमातही गायली गेली आहेत. प्रत्येक वर्षी त्यांचं एक तरी गाणं हिट होतंच आणि दरवर्षी ते मानधनात पाचशे रुपये वाढवतातच. इतर गाण्यासाठी ते कमी जास्त मानधन घेतात. पण लोकगीतांसाठी ते अजिबात कॉम्प्रमाईज करत नाहीत. त्यामुळेच त्यांना आंबेडकरी कलावंतांमधील महागडा गीतकारही म्हटलं जातं. (साभार, आंबेडकरी कलावंत) (when manvel gaikwad met dada kondke, read what happened?)

संबंधित बातम्या:

‘पोपटा’पासून ते ‘आंटीची वाजवली घंटी’पर्यंतची हिट लोकगीतं कुणी लिहिलीय माहित्ये का?; एकदा वाचाच!

‘हॅलो, मी बाबुराव बोलतोय…’ हे गाणं विठ्ठल उमपांकडे कसं आलं?, आधी कुणी गायलं?; वाचा, मजेदार किस्सा!

‘गेली माझी सख्खी बायको गेली…’ या गाण्यात खट्याळपणा येत नव्हता; मग काय झालं?, वाचा!

आंटीच्या अड्डयावर रेड पडली अन् ‘आंटीची घंटी’ सूचलं; वाचा, नादावणाऱ्या गाण्याचा किस्सा

(when manvel gaikwad met dada kondke, read what happened?)