गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेची (Sri Lanka) आर्थिक परिस्थिती खूप बिघडली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या सरकारणे त्या ठिकाणी आणीबाणीची (emergency) घोषणा केली आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे, की लोकांना रोज लागणार्या जीवनावश्यक गोष्टींसाठीही पायपीट करावी लागत आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठीही लोक रस्त्यावर उतरुन रांगा लावत आहेत. आणीबाणीनंतर सरकारच्या सर्व मंत्र्यांनी प्रधानमंत्री महिंद्रा राजपाक्षे यांच्याकडे आपले राजीनामे (ministers resign) सुपूर्द केले आहेत. नागरिक रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध व्यक्त करीत आहेत. अचानक श्रीलंकेत असे काय घडले, की महागाई तीव्र स्वरुपात निर्माण झाली, असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. यासाठी श्रीलंकेतील कुठले घटक जबाबदार ठरले याची कारणमिमांसा आपण या लेखात करणार आहोत.
श्रीलंका गेल्या 75 वर्षांतील सर्वाधिक महागाई, आर्थिक मंदिचा सामना करीत आहे. सध्या श्रीलंकेत आणीबाणी लावण्यात आली असून शनिवारी काही भागांमध्ये संचारबंदी लावण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी श्रीलंकेचे जवानदेखील रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत होते. अनेक लोक एक लीटर दुध घेण्यासही महाग ठरत असल्याची परिस्थिती श्रीलंकेत निर्माण झाली आहे. महागाईमुळे आपल्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास लोक धजावत नसल्याचे बोलले जात आहे.
2019 मध्ये श्रीलंकेतील राजपाक्षे सरकाने मोठ्या प्रमाणात टॅक्समध्ये सुट देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडला. एका रिपोर्टनुसार राजपाक्षे यांनी श्रीलंकेत व्हॅट 15 टक्के घटवून तो 8 टक्के केला होता. त्यामुळे दरवर्षी सरकारी तिजोरीवर 60 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडत होता. त्यामुळे श्रीलंकेचे मोठे नुकसान होउन अर्थव्यवस्था कमकूवत झाली.
गेल्या अडीच वर्षांपासून कोविडच्या प्रभावामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला परंतु याचा सर्वाधिक फटका श्रीलंकेसारख्या पर्यटनावर आधारीत देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून आला. पर्यटन, उद्योग बंद असल्याने याचा मोठा फटका श्रीलंकेला बसून अर्थव्यवस्था कोलमडली. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा साधारण 10 टक्के इतका आहे. परंतु कोविडमुळे पर्यटन बंद असल्याने याचा परिणाम श्रीलंकेला भोगावा लागला. त्यासोबतच प्रचंड बेरोजगारी वाढल्याने लोकांची गंगाजळी आटली. यातून सावरण्यासाठी श्रीलंकेच्या सरकाने आपल्या चलनाची प्रचंड निर्मिती केली. परंतु तरीदेखील श्रीलंकेची अर्थव्यवस्था रसातळाला गेली.
कोविडसह इतर बर्याच कारणांमुळे श्रीलंकेच्या उत्पन्नावर मोठा प्रभाव पडला. त्यामुळे श्रीलंकेवर विदेशी कर्ज घेण्याची वेळ आली व हे कर्ज दिवसेंदिवस वाढतच गेले. त्या तुलनेत उत्पन्न न वाढल्याने याचा मोठा फटका श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बसला. विदेशी कर्ज 173 टक़्के वाढले. एका माहितीनुसार श्रीलंकेवर एकूण 2.55 लाख कोटी रुपये इतके कर्ज आहे. व यात चीनचा वाटा अधिक आहे.
शेती क्षेत्राबाबत विचार केल्यास सरकारचे सुलतानी निर्णय शेतीसाठी मारक ठरले. श्रीलंकेच्या सरकारने घोषणा केली होती, की ते आता पूर्णत: ओर्गेनिक शेती करतील. त्यामुळे श्रीलंकेत किटकनाशक व रासायनिक खतांवर बंदी घालण्यात आली होती. यासाठी चीनने तयार केलेल्या उत्पादनांचा वापर केल्याने अतिशय वाईट परिणाम शेतीवर झाला. शेती उत्पादन घटण्यास सुरुवात झाली. त्यासोबत श्रीलंकेने परदेशातील पाम तेलाच्या आयातीवरही बंदी घातली होती. अशा विविध तुघलकी फतव्यांमुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले व देशातील लोकांची गरज भागेल इतके उत्पादनदेखील श्रीलंका आपल्या देशात निर्माण करु शकली नाही.
संबंधित बातम्या :
Sri Lanka Crisis: घराणेशाहीच्या वाळवीनं अख्ख्या देशाला पोखरलं! राजपक्षे कुटुंबांची का होतेय चर्चा?
Explained: माणसंच नाही तर प्राणीही असतात गे आणि लेस्बियन! काय आहे समलैंगिक संबंधांचं लॉजिक?