रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या चार जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील एका मुलीला वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तर दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक जण अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान हे चौघेही कोल्हापूर रहिवाशी होते.
कोल्हापुरात राहणारे हे कुटुंब गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते सकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आली. त्यानंतर या चौघांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते चौघेही समुद्रात बुडू लागले.
देवस्थानच्या सुरक्षारक्षकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी समुद्राकडे धाव घेतली. त्यानी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गुरुप्रसाद बलकटे या सुरक्षारक्षकाने समुद्रात रिंग टाकून मुलीला वाचवले. मात्र इतर तिघांना वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. यातील काजल मचले आणि सुमन विशाल मचले या दोघींची मृतदेह सापडले आहेत. मात्र राहुल बागडे यांचा शोध सुरु आहे.