मुंबई : देशात शिक्षणाचा अधिकार लागू करण्यात आला, जेणेकरुन कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. त्यामुळे जास्तीत जास्त मुलं शाळेत जाऊ लागली. मात्र शाळेत जाऊनही मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचं चित्र आहे. कारण आठवीपर्यंत वर्ग शिकलेली मुले साधं सामान्य गणितही करु शकत नसल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. इतकच नाही तर एक चतुर्थांश मुलं हे वाचन करु शकत नसल्याचंही यात आढळून आलं.
‘प्रथम’ नावाच्या एका एनजीओने 2018 साली केलेल्या वार्षिक शैक्षणिक अहवाल (एएसईआर) नुसार, मागील काही वर्षांपासून मुलांमध्ये शिकण्याची प्रक्रिया मंदावली आहे. आठव्या वर्गात शिकणारे 56 टक्के विद्यार्थी हे तीन अंकी संख्येला एका अंकाने भागू शकत नाही. तर पाचव्या वर्गातील 72 टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच येत नाही, असं या रिपोर्टमध्ये दिसून आलं. तसेच तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना वजाबाकी जमत नसल्याचही यात दिसून आलं.
2008 साली शिक्षणाची स्थिती याहून बरीच चांगली होती. तेव्हा पाचव्या वर्गातील 37 टक्के विद्यार्थी हे सामान्य गणित सहज करायचे, त्या तुलनेत आज ही संख्या 28 टक्क्यांनी कमी झाली आहे.
गणितच नाही तर मुलांमध्ये वाचन करण्यासंबंधीही समस्या उद्भवत आहेत. आज देशात चारपैकी एक विद्यार्थी व्यवस्थित न अडखळता वाचन करु शकत नाही, त्यामुळे अनेकजन आठव्या वर्गातच शिक्षण सोडून देतात.
सामान्य गणिताच्या बाबतील मुली या मुलांपेक्षा खूप मागे आहेत. देशात फक्त 44 टक्के मुलीच भागाकार करु शकतात. तर मुलांपैकी 50 टक्के मुलं भागाकार करु शकतात. मात्र देशातील काही राज्य जसे की हिमाचल प्रदेश, पंजाब, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये याच्या विपरीत स्थिती बघायला मिळते. इथे मुली या मुलांच्या समोर आहेत.
या रिपोर्टमध्ये सादर करण्यात आलेले सर्व आकडे हे देशातील 28 राज्यांतील 596 जिल्ह्यांतून मिळवण्यात आले आहेत.