शार्दुलचा दोनदा घटस्फोट झाला तर काय? मीही व्हर्जिन नाही : नेहा पेंडसे

| Updated on: Jan 10, 2020 | 10:59 AM

शार्दुल घटस्फोटित असल्याबद्दल लोक का बोलत आहेत? मी तरी व्हर्जिन कुठे आहे! असं सडेतोड उत्तर नेहा पेंडसेने दिलं

शार्दुलचा दोनदा घटस्फोट झाला तर काय? मीही व्हर्जिन नाही : नेहा पेंडसे
Follow us on

मुंबई : बिंदास्त आणि बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे चारच दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर, नेहाचा पती शार्दुल याचा आधी दोन वेळा घटस्फोट झालाच्या चर्चांना जोर आला. त्यावर बोलताना, शार्दुलचा दोनदा घटस्फोट आणि त्याला आधीच्या लग्नांपासून दोन मुली आहेत, तर काय झालं? मीही व्हर्जिन नाही, असं सडेतोड उत्तर नेहा पेंडसेने (Nehha Pendse on Marriage and Virginity) दिलं आहे.

‘आजकाल अनेक कारणांमुळे बऱ्याच जणांचं लग्न उशिरा होतं. करिअरवर लक्ष केंद्रित करणारी आजची पिढी आहे. अनेक जण लग्न होण्याआधी एकापेक्षा जास्त वेळा रिलेशनशीपमध्ये अडकलेले असतात. लग्नाप्रमाणेच निष्ठा, प्रेम आणि शारीरिक जवळीक या गोष्टी रिलेशनशीपमध्येही असतात, फक्त कायद्याचा शिक्का बसलेला नसतो, इतकंच’ असं नेहा पेंडसे एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाली.

शार्दुल घटस्फोटित असल्याबद्दल लोक का बोलत आहेत? मी तरी व्हर्जिन कुठे आहे! तो ज्या महिलांसोबत प्रेमात होता, त्यांच्यासोबत तो किमान एकत्र राहिला, ही चांगली गोष्ट आहे. शार्दुल त्यांच्यासारखा नाही, जे मी रिलेशनशीपचं लग्नात रुपांतर करणार असताना मला सोडून गेले. किमान त्याला कमिटमेंटची किंमत आहे. लग्नसंस्थेवर विश्वास कायम राखल्याबद्दल मी त्याला सलाम करते. दोन लग्न मोडल्यानंतर लग्नसंस्थेवर विश्वास टिकवून ठेवणं कठीण असतं. जर लग्न टिकत नसेल, तर फरपट करण्यापेक्षा तोडावं, यावर माझाही विश्वास आहे’ असं नेहा पुढे म्हणाली.

शार्दुलचं आधी लग्न झालं आहे, हे लपवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. हे कधी ना कधी चर्चेत येणार, हे मला माहित होतं. त्यामुळे मी मोकळेपणाने यावर बोलणार होते. आम्ही मनापासून एकमेकांचा भूतकाळ स्वीकारला आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलताना कोणतंही अवघडलेपण नाही. रिलेशनशीपच्या सुरुवातीच्या काळात आमच्या रोमँटिक गप्पा कमी व्हायच्या. आम्ही आपापल्या आयुष्याबद्दलच भरभरुन बोलायचो. आम्ही दोघंही मोडलेलो होतो. त्यामुळे आमच्या नात्याबद्दल काळजीपूर्वक आणि संवेदनशीलपणे वागत होतो, असं नेहाने स्पष्ट केलं.

नेहा शार्दुलच्या पहिल्या पत्नीला आणि त्याच्या दोन मुलींना भेटली आहे. शार्दुलच्या मोठ्या मुलीसोबत ती सोशल मीडियावर कनेक्टही आहे. ‘शार्दुलचं पहिलं लग्न तुटून दहा वर्ष झाली, तर दुसऱ्या घटस्फोटाला पाच. त्याची पहिली पत्नी आणि मुलींनी मला भेटण्याचं सौहार्द दाखवलं. त्यांचं नातं खेळीमेळीत संपल्याचं मला जाणवलं. त्यांनी तरुणपणी लग्न केलं आणि काही चुका केल्या. पण महत्त्वाचं म्हणजे त्यांचे संबंध सलोख्याचे आहेत, आणि तो वडील म्हणून जबाबदारी पार पाडतो, असंही नेहा पेंडसेने सांगितलं.

मी प्रॅक्टिकल असून लग्नाकडून माझ्या वास्तववादी अपेक्षा आहेत. ‘प्रामाणिकपणे सांगते, आमच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय, काय माहित. एखाद्या कणखर वाटणाऱ्या नात्यातही विस्कळीतपणा येऊ शकतो, हे मला ठाऊक आहे. माझं लग्न होऊन काहीच दिवस झाले आणि पुढील वर्षात काय बदल होतील, याचं भाकित मी आताच वर्तवू शकत नाही. आयुष्य जे काही देईल, ते स्वीकारण्याची माझी तयारी आहे. जन्मोजन्मीची साथ हे फक्त चित्रपटांमध्ये असतं, खऱ्या आयुष्यात नाही. उलट मला वाटतं, एखादा नवखा नवरा ज्या चुका करेल, त्या शार्दुल कधीच करणार नाही. तो मला योग्य मार्गदर्शन करेल असा विश्वास नेहा पेंडसेने व्यक्त केला. Nehha Pendse on Marriage and Virginity