डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

| Updated on: Apr 13, 2020 | 4:17 PM

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया", असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं (Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. अजित पवार यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केले. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा संदेश पाठवला आहे (Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary).

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या घरातच थांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करुया. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया”, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशातून केलं.

“कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून 30 एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा”, असंही अजित पवार म्हणाले.

“बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेलं योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान आणि समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. बाबासाहेब त्यांच्या विचारांनी, कार्याने महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त केला.