नेटवर्क नसल्याने वैताग, महापालिका आयुक्तांसमोरच ‘मोबाईल फोडो’ आंदोलन

| Updated on: Jan 23, 2020 | 5:30 PM

मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्याने अकोल्यातील जनतेने महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर मोबाईल फोडो आंदोलन केलं.

नेटवर्क नसल्याने वैताग, महापालिका आयुक्तांसमोरच मोबाईल फोडो आंदोलन
Follow us on

अकोला : मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्याने अकोल्यातील जनतेने महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर मोबाईल फोडो आंदोलन केलं (Mobile Breaking Protest). अकोला शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शासनाची सर्व कामे ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. बँकेचे ऑनलाईन व्यवहारही ठप्प झाले आहेत. या त्रासामुळे त्रस्त झालेल्या अकोलेकरांनी महानगरपालिका आयुक्तांच्या दलनासमोर मोबाईल फोडो आंदोलन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात मोबाईल फोडण्यात आले (Mobile Breaking Protest).

महानगरपालिकेने मोबाईल कंपन्यांवर कारवाई केली, त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून अकोला शहरात सर्व मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. महानगरपालिकेने मोबाईल कंपन्यांवर कारवाई केल्याने हा प्रकार घडला, असा आरोप अकोलेकरांनी केला आहे. अकोला महानगरपालिका प्रशासन अकोला शहरातील सामान्य नागरिकांना वेठीस धरत असून त्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे. अकोला महानगरपालिका प्रशासन आणि मोबाईल कंपन्यांनी यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा. तसेच, भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी. सामान्य अकोलेकरांना त्यांच्या मुलभूत अधिकारपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

मोबाईल हे आजच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक झाला आहे. सामान्य माणूस ते मोठ मोठे व्यावसायिक या मोबाईलच्या भरवश्यावर आपली महत्त्वाची कामं करत असतात. लोकांच्या सोयीसाठी असलेला मोबाईल हा एक दिवसही बंद झाला तरी अनेक कामं रखडतात. डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी मोदी सरकारकडून शासनाची सर्व कामं डिजीटल केली जात आहेत. ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत. सरकारच्या सर्व योजना आज ऑनलाईन झाल्या आहेत. तसेच, सामान्य नागरिकही प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी मोबाईलचा वापर करायला लागला आहे. त्यामुळे जवळपास सर्वांच्याच मोबाईलमध्ये इंटरनेट असते. मात्र, ज्या मोबाईलशिवाय आपण एक दिवसही राहू शकत नाही तो गेल्या दोन आठवड्यापासून इंटरनेट सेवा रखडल्याने काहीही कामाचा राहिलेला नाही. तसेच, अनेक कामंही त्यामुळे रखडून पडली आहेत. या सर्वांचा रोष व्यक्त करण्यासाठी आणि शासनापर्यंचत आपली मागणी पोहोचवण्यासाठी अकोल्यात मोबाईल फोडो आंदोलन करण्यात आलं.