नागपुरात पाणीकपातीचा मेडिकलला फटका, अनेक शस्त्रक्रिया रखडल्या

| Updated on: Jul 24, 2019 | 10:07 AM

अनेक ठिकाणी प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये देखील पाणीकपात सुरु आहे. मात्र, या कपातीचा फटका थेट रुग्णालयातील रुग्णांना बसत आहे.

नागपुरात पाणीकपातीचा मेडिकलला फटका, अनेक शस्त्रक्रिया रखडल्या
Follow us on

नागपूर : यावर्षीच्या दुष्काळाने राज्यभरातील पाणीसाठे तळाला गेले आहेत. त्यात पावसाळा सुरु होऊन 2 महिने होत आले आहेत. मात्र, अद्यापही म्हणावा असा पाऊस होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये देखील मनपाने पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कपातीचा फटका थेट रुग्णालयातील रुग्नांनाही बसत आहे.

नागपूरमधील रुग्णालांमध्ये लाँड्रीसाठी पाणीच उपलब्ध होत नसल्याने शस्त्रक्रियेसाठी आणि रुग्णांना लागणाऱ्या कपड्यांचीही स्वच्छता होऊ शकली नाही. शस्त्रक्रियेसाठी स्वच्छता हा महत्त्वाचा भाग आहे. अशात कपडे धुतले न गेल्याने स्वच्छ कपड्यांअभावी शस्त्रक्रियाच खोळंबण्याचा धोका तयार झाला आहे.

पाणी टंचाईमुळे आज दिवसभर रुग्णालयातील शस्त्रक्रिया प्रभावित होणार आहे. नागपूरमध्ये रुग्णालयांना दररोज साधारण 15 लाख लिटर पाण्याची आवश्यता असते. मात्र, पाणी संकट असल्याने आणि पुरेसा पाऊस नसल्याने पालिका प्रशासनाने रुग्णालयांच्याही पाणी पुरवठ्यात कपात केली आहे. सध्या मनपाकडून रुग्णालयाला एक दिवसाआड 5-6 लाख लिटर पाणी दिले जात आहे. विशेष म्हणजे रुग्णालय ही नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळी विशेष काही व्यवस्था होणं अपेक्षित आहे. मात्र, पालिकेकडून याबाबत तसे कोणतेही नियोजन केले नसल्याचे दिसत आहे.

आता यापुढे तरी किमान रुग्णांचे हाल लक्षात घेऊन प्रशासन काही उपाययोजना करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.