संतसाहित्य आणि बुवाबाजीवरुन साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ

| Updated on: Jan 11, 2020 | 7:09 PM

मराठी साहित्य संमेलनात एका परिसंवादाच्यावेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. समजात बुवाबाजीचं प्रश्न वाढलं आहे का? या विषयावर परिसंवाद सुरु होता. त्यावेळी हा गोंधळ झाला (Chaos in Marathi Sahitya Sammelan Osmanabad).

संतसाहित्य आणि बुवाबाजीवरुन साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ
Follow us on

उस्मानाबाद : मराठी साहित्य संमेलनात एका परिसंवादाच्यावेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. समजात बुवाबाजीचं प्रश्न वाढलं आहे का? या विषयावर परिसंवाद सुरु होता. त्यावेळी हा गोंधळ झाला (Chaos in Marathi Sahitya Sammelan Osmanabad). जगन्नाथ पाटील या व्यक्तीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता किंवा कल्पना न देता अचानक कार्यक्रम सुरु असताना मला दोन मिनिटं बोलू द्या असा अट्टहास करत माईक ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संमेलनात एकच गोंधळ उडाला.

उस्मानाबाद येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात समाजातील वाढतं बुवाबाजीचं प्रस्थ याविषयावर परिसंवाद सुरु होता. काही तरुणांनी संतसाहित्यामुळे समाजात बुवाबाजीचं प्रमाण वाढत असल्याचं म्हणत बोलू देण्याची मागणी केली. त्यानंतर जगन्नाथ पाटील या व्यक्तीने देखील आपण पत्रकार असल्याचं सांगून बोलू द्या म्हणत माईक ओढला. त्यानंतर मंचावर एकच गोंधळ झाला. यानंतर आयोजकांनी तात्काळ त्यांना मंचावरुन खाली उतरवले. या गोंधळातच साहित्य संमेलन पुन्हा सुरु झाले.

परिसंवाद होण्याआधी काही तरुण संमेलनास्थळी आले. त्यांनी संतसाहित्यामुळे बुवाबाजीचं प्रस्थ वाढत आहे असं म्हटलं. तसेच त्यांना त्यांचं मत मांडू देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी आयोजकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक मंचावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आयोजकांनी त्यांना त्यांचं जे म्हणणं आहे ते लिखित स्वरुपात देण्यास सांगितलं. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे साहित्य संमेलनात काहीवेळ गोंधळ झाला. काहीवेळाने हे तरुण गोंधळ घालून निघून गेले. पोलिसांकडून या तरुणांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

मंचावर गोंधळ घालणारे जगन्नाथ पाटील म्हणाले, “मी दोन मिनिटांची परवानगी मागितली. मला बोलण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून हा गोंधळ झाला. बाकी माझा साहित्य संमेलनावर आक्षेप नाही. आत्ताही मला बोलण्याची परवानगी द्या मी बोलतो. मी संत साहित्याच्या बाजूने आहे.”

बोलण्यासाठी परवानगी मागणाऱ्या जगन्नाथ पाटील यांनी या गोंधळावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्या तरुणांशी माझा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

जगन्नाथ पाटील म्हणाले, “संत साहित्याचा प्रचार व प्रसार यासाठी संत साहित्यपीठाची स्थापन केली होती. मात्र कारवाई करण्यास सरकारकडून दिरंगाई होत होती. पैठणच्या या संत साहित्यपीठाला मान्यता मिळून 25 वर्ष झाले आहेत. तरीही त्याचं काम सुरु होत नाही. याबाबत मी याचिका दाखल केली आहे. याचीच माहिती देण्यासाठी मी मंचाावर बोलण्याची परवानगी मागितली. मात्र, तितक्यात इतर लोक आले आणि बोलू द्या म्हणू लागले. ते कोण होते, कुठून आले माहिती नाही. माझ्या मागणीचा आणि झालेल्या गोंधळाचा संबंध नाही. मला कोणताही वाद घालायचा नाही. माझा संमेलनाला पाठिंबा आहे. काही इतर लोकांनी गोंधळ घातला. त्यामुळे आयोजकांना अडथळा झाला असेल तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.”

यावर आयोजकांनी मात्र सुरक्षा पुरवण्याची भूमिका घेतली आहे. दोन चार लोकांच्या गोंधळामुळे आम्ही येथे आलेल्या 25 हजार लोकांच्या आनंदावर विरजन पडू देणार नाही. संमेलनाला सुरक्षा पुरवली जाईल आणि हा कार्यक्रम असाच सुरु राहिल, असं मत आयोजकांनी व्यक्त केलं आहे.