मुजफ्फरपूर: बिहारमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात तीव्र मेंदुज्वराने (अॅक्यूट इन्सेफेलायटिस सिन्ड्रोम) आतापर्यंत 90 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यात राज्यासह केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अपयशी ठरताना दिसत आहे.
मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण वैद्यकीय रुग्णालयातील (SKMCH) आयसीयूमध्ये अॅक्यूट इन्सेफेलायटिस सिन्ड्रोममुळे प्रत्येक दिवशी 8 ते 10 मुलांचा मृत्यू होत आहे. हे रुग्णालय जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून येथे लहान मुलांचा जीव धोक्यात टाकला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरच उपलब्ध नसल्याचाही आरोप होत आहे. आजारी मुलांच्या कुटुंबीयांचेही रुग्णालयात हाल होत आहेत. रुग्णालयातील आयसीयूत एकाच खाटावर 2-3 मुलांना ठेवल्याचेही सांगण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही उशीरा यावर हालचाल केली. बऱ्याच उशीराने मंत्र्यांनी रुग्णालयाला भेटी देण्यास सुरुवात केली आहे. मंत्र्यांच्या भेटीच्यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ डॉक्टर असतात, मात्र आयसीयूच्या स्थितीत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. आरोग्यमंत्री हर्षवर्धन सिंह यांनी रविवारी श्रीकृष्ण वैद्यकीय रुग्णालयाला भेट दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
रुग्णांची संख्या जास्त असल्याने उपचारासाठी डॉक्टरची संख्या कमी पडत असल्याचेही पाहायला मिळत आहे. तसेच आवश्यक औषधे आणि यंत्रणांचीही कमतरता असल्याचेही सांगितले जात आहे. रुग्णालयाने मात्र औषधांची कमतरता नसल्याचे म्हटले आहे. रुग्णालय प्रशासन म्हणाले, ‘कोणत्याही डॉक्टरांनी औषधांच्या कमतरतेबाबत अहवाल दिलेला नाही. औषधे कमी पडल्यास तात्काळ ते उपलब्ध केले जातात. जी मुले गंभीर स्थितीत दाखल केली जात आहेत, त्यांना वाचवणे कठीण होत आहे. आयसीयूमध्ये बेड्सची संख्या कमी आहे.’
बिहारमध्ये सध्या अॅक्यूट इन्सेफेलायटिस सिन्ड्रोम या मेंदूज्वराचा मोठा संसर्ग झाला आहे. बिहारमध्ये या आजाराला ‘चमकी बुखार’ असेही म्हटले जाते. या आजारात मुलांना तीव्र ताप येणे आणि शरीर अकडल्यासारखे होणे, बेशुद्ध होणे, त्याचबरोबर उलटी होणे आणि चिडचिड होणे अशी लक्षणे दिसत आहेत.