शांत बसायचं नाही, आता नडायचं! धनंजय मुंडेंचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : किसान सभेच्या नेतृत्त्वात आदिवासी आणि शेतकरी बांधवांनी आज पुन्हा एकदा नाशिकमधून मुंबईच्या दिशेने मोर्चा आणला आहे. नाशिकमधून सकाळीच मोर्चा निघाला आहे. गेल्यावेळी सरकारने दिलेली आश्वासनं हवेत विरली. त्यामुळे यावेळी लेखी आश्वासन घेण्यासाठी शेतकरी पुन्हा राजधानीकडे रवाना झाले आहेत. या शेतकऱ्यांना उद्देशून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला […]

शांत बसायचं नाही, आता नडायचं! धनंजय मुंडेंचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र
Follow us on

मुंबई : किसान सभेच्या नेतृत्त्वात आदिवासी आणि शेतकरी बांधवांनी आज पुन्हा एकदा नाशिकमधून मुंबईच्या दिशेने मोर्चा आणला आहे. नाशिकमधून सकाळीच मोर्चा निघाला आहे. गेल्यावेळी सरकारने दिलेली आश्वासनं हवेत विरली. त्यामुळे
यावेळी लेखी आश्वासन घेण्यासाठी शेतकरी पुन्हा राजधानीकडे रवाना झाले आहेत. या शेतकऱ्यांना उद्देशून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन जाहीर करतच, त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या लावून धरण्याचं आश्वासनही दिले आहे.

शांत बसायचं नाही, आता नडायचं : धनंजय मुंडे

“मराठवाड्याचा सुपूत्र, तुमचा लेक, तुमचा भाऊ, तुमचा मित्र या नात्याने मी तुमच्या आंदोलनास पाठिंबा पाठवत आहे. तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मी स्वत: लढा देईन. या सरकारला झुकवल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही. आता नडायचं…” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चाला जाहीर पाठिंबाही दिला आहे.

धनंजय मुंडे यांचं पत्र जसंच्या तसं :

माझ्या प्रिय,
शेतकरी बांधवांनो

खेड्या-पाड्यात राहणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज सत्तेत असलेल्या शेठ लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यांमुळे घामात भिजलेले, कष्टाने काटकुळे झालेले त्यांचे देह मागच्या वर्षी आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत पायी आले होते. ऊनाचे चटके सहन करत, काट्याकुट्यातून मार्ग काढत रक्ताळलेले पाय मुंबईत आले खरे, पण या सरकारला अद्याप पाझर फुटलेले नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनांची खैरात करत तुम्हाला रिकाम्या हातीच माघारी पाठवले.

आज पुन्हा त्याच मागण्या घेऊन, तुमचे थकलेले देह नाशिकहून मुंबईकडे निघाले आहे. घरं ओस पडत आहेत, शेत पेरणीसाठी आपल्या मालकाची वाट बघतायत, बैल जोड गोठ्यात दिवस काढतेय… आपल्या बापाने जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नये या धास्तीत शेतकऱ्यांची मुलं एक-एक दिवस लोटतायत. मात्र माझा शेतकरी सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही. जमवलेली तुटपूंजी रक्कम घेऊन, शिळी भाकर गाठोड्यात बांधून या शेठ लोकांपर्यत त्याचा खोल गेलेला आवाज पोहोचावा म्हणून मुंबईत येतोय. जगाच्या पोशिंद्याला नाईलाजाने सत्तेत मशगूल असलेल्या लोकांची हाजीहाजी करावी लागतेय. ही गोष्ट जीवाला लागतेय. माझ्या शेतकऱ्याचा हा अपमान आहे. मराठवाड्यातही आज भीषण परिस्थिती आहे. भेगाळलेल्या, भकास जमिनी पाहिल्या की छातीत धस्स होतं. शेतकऱ्याच्या पोटी जन्म नकोच, असे वाईट विचार मनाला शिवतायत. मराठवाड्याचा सुपूत्र, तुमचा लेक, तुमचा भाऊ, तुमचा मित्र या नात्याने मी तुमच्या आंदोलनास पाठिंबा पाठवत आहे. तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मी स्वत: लढा देईन. या सरकारला झुकवल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही. आता नडायचं…

तुमचा,
धनंजय मुंडे

किसान मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना

राजधानी मुंबईवर धडकण्यासाठी पुन्हा एकदा ‘लाल वादळ’ म्हणजेच आदिवासी आणि शेतकरी बांधवांचा लाँग मार्च नाशिकमधून निघाला आहे. नाशिकमधील मुंबई नाका बसस्थानक परिसरात राज्यभरातून हजारो आदिवासी, शेतकरी जमले आणि तिथून राजधानी मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे हे सर्व शेतकरी मंत्रालयावर जाऊन धडकणार आहेत आणि आपल्या सरकार दरबारी मांडणार आहेत.