Marathwada Corona Update | लढवय्या मराठवाडा कोरोनाचा मुकाबला कसा करतोय?

| Updated on: Apr 24, 2020 | 5:53 PM

संपूर्ण जग कोरोना व्हायरस या साथीमुळे हबकून गेलेलं आहे. मात्र दुसरीकडे मराठवाडा मात्र या साथीचा जोमाने सामना करत आहे (Fight of Marathwada against Corona Virus).

Marathwada Corona Update | लढवय्या मराठवाडा कोरोनाचा मुकाबला कसा करतोय?
Follow us on

औरंगाबाद : संपूर्ण जग कोरोना व्हायरस या साथीमुळे हबकून गेलेलं आहे. मात्र दुसरीकडे मराठवाडा मात्र या साथीचा जोमाने सामना करत आहे (Fight of Marathwada against Corona Virus). अगदी आतापर्यंत मराठवाड्यात 2 जिल्हे असे होते ज्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नव्हता. विशेष म्हणजे आता मराठवाड्यात 3 जिल्हे असे आहेत जे थेट ग्रीनझोनमध्ये आले आहेत. इतर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग खूप नियंत्रणात आहे. याबाबतच मराठवाड्याचा घेतलेला हा एक विशेष आढावा.

औरंगाबाद म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार. हे शहर सध्या कोरोना व्हायरसचा मोठ्या जोमाने सामना करत आहे. 8 मार्च रोजी औरंगाबाद शहरात पहिला कोरोना पेशंट सापडला आणि शहरातल्या प्रत्येक नागरिकांचे धाबे दणाणले. मात्र कझाखस्तानातून आलेल्या कोरोना रुग्ण औरंगाबादमध्ये अवघ्या 7 दिवसांमध्ये कोरोना मुक्त झाला आहे. त्याला आता डिस्चार्जही मिळाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, हा आनंद औरंगाबादकरांसाठी क्षणिक ठरला. कारण 1 एप्रिलपासून औरंगाबाद शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्णांची नोंद होण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता हा आकडा 40 वर जाऊन पोचला. यातील 5 जणांना आपले प्राणही गमवावे लागले. मात्र तब्बल 22 जिगरबाज रुग्णांनी कोरोना या आजारावर मात करुन घराचा उंबरा सुद्धा चढला. सध्या औरंगाबाद शहरात फक्त 13 पेशंट उपचार घेत आहेत. अजूनही औरंगाबाद शहर हे कम्युनिटी स्प्रेडिंगच्या स्टेजपासून लांब आहे.

औरंगाबाद बरोबर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात कोरोना व्हायरस या साथीचा फैलाव झालाच. मात्र यातल्या काही जिल्ह्यांनी कोरोनाचा सामना करुन कोरोनाचे संकट परतावून लावले. तर काही जिल्हे अजूनही सामना करत आहेत. यातला सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणजे लातूर. औरंगाबादनंतर लातूर या जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. दिल्लीतल्या मरकज येथून आंध्र प्रदेशातील आपल्या गावी निघालेल्या काही मुस्लिम भाविकांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी केली. तेव्हा त्यातल्या 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पाहता पाहता लातूर हा जिल्हा हॉटस्पॉटमध्ये आला. या आठही मुस्लिम भाविकांवर तब्बल 15 दिवस लातुरातल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर हे आठही जण ठणठणीत बरे झाले आहेत. यानंतर त्यांना त्यांच्या गावीही पाठवून देण्यात आलं. त्यामुळे हॉटस्पॉट झालेला लातूर जिल्हा थेट ग्रीन झोनमध्ये आला.

उस्मानाबाद

हॉटस्पॉटमधून ग्रीन झोनमध्ये आलेला मराठवाड्यातील आणखी एक जिल्हा म्हणजे उस्मानाबाद. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात मरकजवरुन आलेले दोन, तर हॉटेल ताज दिल्ली येथून आलेला एक पेशंट आढळला होता. त्यांना तातडीने उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तब्बल 14 दिवस यांच्यावर उपचार करण्यातआले. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 85 लोकांनाही क्वारंटाईन करण्यात आलं. मात्र, यातल्या कुणालाही कोरोनाची बाधा झाली नाही. 14 दिवसानंतर कोरोनाची लागण झालेल्या तिन्ही रुग्णांना आणि क्वारंटाईन केलेल्या 85 नागरिकांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हाही कोरोना मुक्त झाला.

बीड

कोरोनाच्या या सगळ्या धामधुमीत पहिल्यापासून एक जिल्हा मात्र सर्वात सुरक्षित राहिला तो जिल्हा म्हणजे बीड. बीड जिल्ह्यात सुरुवातीला एकच कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. आष्टी तालुक्यातील पिंपळा या गावातल्या रुग्णावर अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर हाही रुग्ण पूर्णपणे बरा झाला. यानंतर ऑरेंज झोनमध्ये असलेला बीड जिल्हा पूर्णपणे कोरोना मुक्त झाला. सध्या बीड जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही. कोरोनाचा सध्या तरी बीड जिल्ह्याला धोका नसल्याचं दिसंतय.

नांदेड

मराठवाड्यातील नांदेड हा कोरोना अनेक दिवस रोखून धरलेला जिल्हा होता. केंद्राच्या आरोग्य पथकानेही नांदेड जिल्ह्याचं कौतुक केलं होतं. मात्र हे कौतुक औटघटकेच ठरलं. चारच दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात एक कोरोना बाधित रुग्ण आढळला. आधीपासूनच सतर्क असलेली नांदेड जिल्ह्यातील यंत्रणाही यानंतर आणखी कामाला लागली. सध्या तरी नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित दुसरा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोना व्हायरस हा सध्या तरी नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे.

परभणी

नांदेडनंतर परभणी जिल्ह्यातही बराच काळ एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. मात्र 8 दिवसांपूर्वी परभणी शहरातही एक करोना रुग्ण आढळला आहे. सध्या या रुग्णावर परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 8 दिवसानंतरही परभणी जिल्ह्यात नवा पेशंटसमोर आला नाही. त्यामुळे परभणी जिल्हाही धोक्याबाहेर असल्याचं दिसून येत आहे.

जालना

जालना जिल्ह्यातही कोरोनाचे सध्या 2 रुग्ण आहेत. या दोन्ही पेशंटवर जालना येथील जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार केले जात आहेत. जालना जिल्ह्यातही कोरोना सध्या नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे.

हिंगोली

दुसरीकडे हिंगोलीत मात्र परिस्थिती गंभीर असल्याचं दिसतंय. हिंगोलीत आतापर्यंत एकूण 7 पेशंट कोरोना बाधित आढळले आहेत. त्यातल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आणखी 6 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे हे सगळे रुग्ण एसआरपीएफचे जवान आहेत.

संबंधित बातम्या :

Pune Corona | 74 हॉस्टेल्स, 300 शाळा सज्ज, पुण्यात कोरोना लढ्यासाठी प्रशासनाची काय काय तयारी?

Malegaon corona | मालेगावातील बडा कब्रस्तानात दफनविधीसाठी आठ दिवसात तिप्पट मृतदेह

सहा महिन्याच्या बाळाला कोरोना, दूध पाजायचं कसं? मातेने पान्हा पाजला, दुधाच्या ताकदीने कोरोनाला हरवलं

Fight of Marathwada against Corona Virus