नवी दिल्ली : बडगाममध्ये झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये हवाईदलाची चूक असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञ आणि भारतीय सैन्याचे निवृत्त कर्नल अजय शुक्ला यांनी केला आहे. तसेच ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तपासाचा अहवाल निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध न करण्यासाठी दबाव असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी बिझिनेस स्टँडर्ड आणि आपल्या ब्लॉगमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
हवाई दलातील 2 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे आपण हे सांगत असल्याचेही अजय शुक्ला यांनी सांगितले. श्रीनगर एअर बेसवर संबंधित Mi-17V5 हेलिकॉप्टर पाकिस्तानचे असल्याचे समजून भारताकडून त्याच्यावर क्षेपणास्त्र डागले गेले. त्यामुळे ही दुर्घटना झाली. यात 6 पायलट आणि 1 नागरिक अशा एकूण 7 जणांचा मृत्यू झाला होता.
काय आहे प्रकरण?
जैश-ए-मोहम्मदचा एक आत्मघातकी दहशतवादी पुलवामा येथे जीपसह सैन्याच्या ताफ्यात घुसला आणि स्वतःला स्फोटकांनी उडवले होते. त्यात भारताच्या 40 जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 12 दिवसांनी भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ठिकाणांवर हल्ला केला होता. दरम्यान, पाकिस्तानी हवाई दल आणि भारताच्या हवाई दलातही लढाई झाली. त्याचवेळी भारताच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरची दुर्घटना घडली. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला.
‘अहवाल निवडणुकीनंतर प्रसिद्ध करण्याचा दबाव’
“या प्रकरणात सुरक्षेसंबंधित त्रुटी शोधून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. जेणेकरुन ही कारवाई यापुढे उदाहरण बनेल आणि पीडितांना न्याय मिळेल. मात्र, उच्च स्तरावरुन तपास संथ करुन हा अहवाल निवडणुकीनंतर प्रसिद्ध करण्याचा दबाव असल्याचे काही हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे”, असा दावा अजय शुक्ला यांनी केला आहे. शुक्ला यांनी आपल्या लेखात म्हटले आहे, “बालाकोटवर केलेला हल्ला आणि पाकिस्तानच्या F-16 विमानाला कथितपणे पाडण्याला निवडणुकींमध्ये भारताचा मोठा विजय म्हणून सांगितले जात आहे. जर भारताच्या स्वतःच्या चुकीमुळे ही दुर्घटना झाली आणि त्यात 7 लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर आली तर त्याचा निवडणुकींवर परिणाम होईल, म्हणून हा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आला आहे.”
‘निवडणुकीचा आणि हा अहवाल पूर्ण करण्याचा कोणताही संबंध नाही’
भारतीय हवाई दलाने (IAF) या दुर्घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगत अजय शुक्ला यांच्या दाव्याचे खंडन केले आहे. तपासाला दिरंगाई का होत आहे? अशी विचारणा केल्यानंतर IAF ने कोर्ट ऑफ इन्क्वायरीसाठीच्या वेळेचा अंदाज करता येऊ शकत नसल्याचे म्हटले. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “कोर्ट ऑफ इन्क्वायरी अतिशय सुक्ष्मपणे करावयाची आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. याआधी झालेले सर्व तपास याची साक्ष देतील. सर्व प्रकरणांमधील चौकशी पूर्ण झाल्याशिवाय यावर काहीही सांगता येणार नाही. निवडणुकीचा आणि हा अहवाल पूर्ण करण्याचा कोणताही संबंध नाही.”
‘दुर्घटनेत भारताच्या 7 लोकांचा जीव गेला, तरिही तपासात दिरंगाई’
हवाई दलाच्या प्रतिक्रियेवर शुक्ला यांनी लिहिले, “हवाई दलाने माझ्या लेखाचा जो मुलभुत मुद्दा होता तो मान्य केला आहे. त्या दुर्घटनेत भारताच्या 7 लोकांचा जीव गेला. त्याला 2 महिने होऊन गेले तरीही चौकशी पूर्ण होत नाही. मला हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवालाच्या दिरंगाईला वरिष्ठ पातळीवरचा दबाव जबाबदार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे.”
कोण आहेत अजय शुक्ला?
अजय शुक्ला हे भारतीय सैन्यातील निवृत्त कर्नल आहेत. 22 वर्षे सैन्यात काम केल्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. सध्या ते संरक्षण पत्रकारिता करत आहेत.
अजय शुक्ला यांचे रिपोर्टींग :
संंबंधित बातम्या :
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायूसेनेचं लढाऊ विमान कोसळलं, दोन पायलट शहीद
बडगाममधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत वायूसेनेच्या 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू
विमान अपघातात नाशिकचे स्काॅर्डन लीडर शहीद
शहिदाच्या चिमुकलीला पाहून गोदाकाठ गहिवरला!