घर बसल्या हवामान पाहा आणि मगच शेतात जा, शेतकऱ्यांसाठी खास App

| Updated on: Aug 27, 2019 | 10:42 PM

देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे शेतकऱ्यांना घर बसल्या हवामान आणि कृषी सल्ल्याची माहिती मिळणार आहे. हवामान विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेने मेघदूत हे ॲप विकसित केले आहे.

घर बसल्या हवामान पाहा आणि मगच शेतात जा, शेतकऱ्यांसाठी खास App
Follow us on

पुणे : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे शेतकऱ्यांना घर बसल्या हवामान आणि कृषी सल्ल्याची माहिती मिळणार आहे. हवामान विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेने मेघदूत हे ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ही सर्व माहिती उपलब्ध होईल.

मेघदूत अॅपमुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेत आपल्या पिकांचे नियोजन करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचं संभाव्य नुकसानही टाळण्यास हातभार लागणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना आपआपल्या जिल्ह्यानुसार आपल्या मातृभाषेत ही माहिती उपलब्ध होणार आहे.

मागील महिनाभरापासून या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याची माहिती कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. क्रिपण घोष यांनी दिली. यापूर्वी एसएमएसद्वारे (SMS) आणि संकेस्थळावर माहिती दिली जात होती. मात्र या अॅपमुळे आता शेतकऱ्यांना अधिक माहिती उपलब्ध होईल. मेघदूत ॲपच्या माध्यमातून देशभरातील 658 जिल्ह्यात माहिती दिली जाईल. आतापर्यंत 150 जिल्ह्यांना माहिती मिळत आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये माहिती देण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. लवकरच तेथेही ही व्यवस्था उपलब्ध होईल.

मेघदूत ॲपमध्ये तापमान, पाऊस आणि पीक सल्ल्याची माहिती दिली जाते. या ॲपच्या माध्यमातून मागील 10 दिवसांची आणि पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नियोजन करण्यास मोलाची मदत होत आहे. पुढील एक-दोन दिवसात पाऊस पडणार असेल, तर शेतकरी पिकाला पाणी देणे आणि औषध फवारणी करणे टाळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार असून पिकाला फायदा होणार आहे.

मेघदूत ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी एका क्लिकवर हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला मिळणार आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात अगदी बांधावर उभं राहून शेतकऱ्यांना माहिती मिळेल. शेतकर्‍यांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे. मात्र, हवामान विभागाचा अंदाज अचूक असणे देखील गरजेचे आहे. अन्यथा ॲप असूनही तो अंदाज चुकीचा ठरला तर ॲपची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था होईल.