कल्याण : रोजंदारीवर 300 रुपये कमवणाऱ्या एका कामगाराला आयकर विभागाकडून (Income tax notice to worker) 1 कोटी 5 लाख रुपये भरण्याची नोटीस आली आहे. यामुळे त्या कुटुंबासह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाऊसाहेब अहिरे असे या नोटीस आलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याने इन्कम टॅक्स विभाग आणि पोलिसांना संबंधित प्रकरणाचा तपास करुन ठोस कारवाईची मागणी केली आहे.
कल्याण जवळ असलेल्या मोहने येथील आर. एस. टेकडी परिसरात राहणारे भाऊसाहेब आहिरे हे एका पत्र्याच्या झोपडीत राहतात. त्यांना दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे. ते हातमजूर करुन कुटुंबाचे पोट भरतात. त्यांना दिवसाला केवळ तीनशे ते चारशे रुपये रोजंदारी मिळते. त्यातही सातत्य नसते. त्यात त्यांना इन्कम टॅक्स विभागाने चक्क 1 कोटी पाच लाख रुपये भरण्याची नोटीस पाठविल्याने त्यांचे डोक चक्रावून गेले आहे.
नोटाबंदीच्या काळात त्यांच्या कागदपत्राचा गैरवापर करत मुंबईतील कोटक महेंद्रा बँकेत त्यांच्या नावाचे खाते उघडले गेले. त्या खात्यावर पैशाचा व्यवहार झाला. याविषयी त्यांना काहीही माहिती नसताना त्यांच्या नावे चक्क इन्कम टॅक्सची दोन वेळा नोटीस आली. त्यामुळे ते भांबावून गेले आहेत.
याप्रकरणी त्यांनी बँकेत चौकशी केली आहे. बँकेच्या मुंबई शाखेत त्यांच्या नावाचे खाते कोणीतरी अन्य इसमाने खोललं आहे. विशेष म्हणजे भाऊसाहेब त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही मुंबईला गेलेले नसल्याचे ते सांगतात. या प्रकरणी त्यांनी इन्कम टॅक्स आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली (Income tax notice to worker) आहे.