मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. महाबळेश्वर आणि कोकण वगळता इतर सर्व ठिकाणी तापमान 40 अंशापार पोहोचले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 26 एप्रिल रोजी अकोल्यात 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही लक्षणीय वाढ होत आहे. मात्र येत्या 29 एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी राज्यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपूरी, परभणी या ठिकाणी तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला गेला. मध्य महाराष्ट्रात म्हणजेच अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर या विविध जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये तापमानाने चाळीशी गाठली. त्याशिवाय कोकणातही उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेला.
शुक्रवारी पुण्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या 10 वर्षातील पुण्यातील हे सर्वात उच्चांकी तापमान आहे. पुण्यात 23.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईतही वाढत्या तापमानामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत. शुक्रवारी मुंबईत 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
महाराष्ट्रातील तापमानाची नोंद :
पाहा व्हिडीओ :