Silk Farming | जय-विरुची जोडी, शेतात राबली, संकटकाळात रेशीम शेतीतून लाखो कमावले

| Updated on: Aug 11, 2020 | 4:06 PM

रेशीम शेतीतून त्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग गवसला असून, त्यांची यशकथा ही संकटात सापडलेल्या इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

Silk Farming | जय-विरुची जोडी, शेतात राबली, संकटकाळात रेशीम शेतीतून लाखो कमावले
Follow us on

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पारंपरिक पीक पद्धतीला (Jalgaon Silk Farming) फाटा देत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा मार्ग निवडला. शेतीचे योग्य नियोजन, परिश्रम आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रेशीम मालाची विक्री अशा त्रिसूत्रीच्या जोरावर हे दोन्ही शेतकरी वर्षाकाठी खर्चवजा जाता लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत (Jalgaon Silk Farming).

रेशीम शेतीतून त्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग गवसला असून, त्यांची यशकथा ही संकटात सापडलेल्या इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. विकास रामकृष्ण पाटील आणि राहुल विश्वनाथ पाटील अशी या उपक्रमशील शेतकऱ्यांची नावे आहेत. विकास पाटील हे जामनेर तालुक्यातील देव पिंपरी येथील तर राहुल पाटील हे पळासखेडा येथील रहिवासी आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

देव पिंपरी हे विकास पाटील यांचे गाव. गावाच्या आजूबाजूला अवर्षणप्रवण भाग असल्याने याठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर येथील शेती अवलंबून आहे. त्यातही पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडला नाही तर, शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. वर्षानुवर्षे हीच स्थिती कायम असते. त्यामुळे विकास पाटील हे कर्जबाजारी झालेले होते. दरवर्षी शेतीत टाकलेला खर्चही निघत नसल्याने ते नैराश्येच्या गर्तेत सापडले होते.

शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करावा, अशी त्यांची इच्छा होती. पण नेमकं काय करावे तेच सुचत नव्हते. या विवंचनेत असताना सुदैवाने त्यांना कृषी विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या रेशीम शेतीच्या योजनांची माहिती मिळाली. नियोजनबद्ध रितीने रेशीम शेती केली, तर चांगला नफा मिळू शकतो, असा विश्वास त्यांना आला. मग त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रेशीम शेतीची संपूर्ण माहिती मिळवली (Jalgaon Silk Farming).

आजवर शेतीत अनेक प्रयोग करुनही यश न आल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आपल्या शेतात रेशीम शेतीचे युनिट उभारण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांनी आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. तसेच शेतात एका ठिकाणी रेशीम अंडीपुंजसाठी 50 बाय 30 फूट आकाराचे शेड उभारले. 100 अंडीपुंज आणून रेशीम काढणे सुरु केले. रेशीम शेतीचा फारसा अनुभव नसल्याने पहिल्या बॅचमध्ये त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मात्र, तरीही त्यांनी निराश न होता, प्रयत्न सुरुच ठेवले. पुढे अनुभवातून त्यांना रेशीम शेतीचे तंत्र अवगत झाले. मग हळूहळू चांगले उत्पन्न मिळू लागले.

राहुल विश्वनाथ पाटील हे युवा शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 6 ते 7 एकर शेती आहे. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने त्यांना काहीही उत्पन्न मिळत नव्हते. सततची नापिकी, दुष्काळ त्यातच शेतीमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे ते कर्जबाजारी होऊन आर्थिक विवंचनेत सापडले होते. शेतीत काहीतरी वेगळे करावे, या उद्देशाने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. रेशीम शेतीविषयी माहिती घेऊन त्यांनी आपल्या शेतात रेशीम शेतीचे युनिट उभारण्याचे ठरवले.

सुरुवातीला दोन एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली आणि शेतात एका बाजूला 50 बाय 30 आकाराचे शेड उभारले. त्या शेडमध्ये 100 अंडीपुंज आणून रेशीम काढणे सुरु केले. पहिल्याच बॅचमध्ये त्यांना 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. मग ते साडे तीनशे अंडीपुंजपर्यंत पोहोचले. म्हणून त्यांचे उत्पन्न वाढत गेले (Jalgaon Silk Farming).

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत मका, बाजरी, कापूस, तुरीवर नाकतोड्याची धाड

उचलली रिस्क, प्रॉफिट फिक्स! बीडमध्ये शतावरीचं पीक घेऊन तब्बल 10 लाखांचं उत्पन्न!