चंद्रपूर : स्वातंत्र्याचे जाज्वल्य आंदोलन, चले जावचा संघर्ष, विदेशी कापडाची होळी, क्रांतिकारकांनी चेतवलेलं स्फुल्लिंग या सर्वात एक समान धागा म्हणजे स्वदेशी उत्पादनाची चळवळ (Khadi production centres in Chandrapur). राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वदेशी वस्तूंच्या उत्पादनासाठी देशभर जाणीवपूर्वक स्वदेशी वस्तू उत्पादन केंद्रे उभारली. मात्र सध्या या केंद्रांची दुरवस्था झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील खादी निर्मिती केंद्रही यापैकीच एक असून अखेरची घटका मोजत आहे (Khadi production centres in Chandrapur).
बापूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ‘सावली’तील खादी केंद्राला अक्षरशः घरघर लागली आहे. उत्तम दर्जाच्या विणकर कारागिरांअभावी येथील खादी उत्पादन ठप्प झालं आहे. 1933 आणि 1936 रोजी गांधीजींनी या केंद्रात स्वतः वास्तव्य केलं. त्यांनी स्वदेशी वस्तूंचा प्रसार आणि उत्पादनासाठी सावली येथील ‘नागविदर्भ चरखा संघाची’ जागा निवडली. मात्र, सध्या येथील काम केवळ धागा उत्पादन एवढ्यावरच मर्यादीत झालं आहे. देशभर युवा वर्गात खादी लोकप्रिय होत असताना प्रत्यक्षात मात्र खादी केंद्रांची दुरवस्था पाहायला मिळत आहे.
सावली हे चंद्रपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकीय घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र राहिलं. याच गावात महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाग विदर्भ चरखा संघाची खादी निर्मिती केंद्राची इमारत आहे. आजही अत्यंत निसर्गरम्य असं हे ठिकाण दोनदा बापूंच्या वास्तव्याने पुनीत झालेलं आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वदेशी वस्तूंचा प्रचार-प्रसार आणि त्याचं उत्पादन याचे महत्त्व गांधीजींनी ओळखले. त्यातूनच खादी आणि स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीसाठी देशभर केंद्रे उभारली गेली. यातील एक महत्त्वाचे केंद्र सावली येथे उभारण्यात आलं.
या केंद्रात खादी आणि स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीची प्रक्रिया होत होती. नव्वदच्या दशकापर्यंत या केंद्रात उत्तम दर्जाच्या खादीची निर्मिती केली गेली. मात्र, त्यानंतरच्या काळात खादीची मागणी घटली आणि त्याचे दैनंदिन वापरातील चलन कमी झाले. त्यामुळे या केंद्राला घरघर लागून कर्मचारी वर्गावर बेरीजगारीची वेळ आली. 1933 आणि 1936 अशा दोन वेळी गांधीजी या केंद्रात आले होते. महात्मा गांधींच्या मानस पुत्राचा विवाह सोहळा देखील याच परिसरातील एका झाडाखाली झाला होता. हे केंद्र राजकीय चिंतनशील घडामोडींचं केंद्र होतं. जुनेजाणते गांधीवादी या स्थळाला तीर्थक्षेत्रही संबोधतात.
मागील काही वर्षे खादीच्या सार्वजनिक जीवनातील चलनाची चर्चा होत आहे. आजचा युवा वर्ग पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला आहे असंही बोललं जातं. मात्र प्रत्यक्षात खादी निर्मितीची केंद्रे ओस पडत चालली आहेत. यातील कामगार वर्ग हळूहळू कमी होत असून सूतकताई आणि चरखा यांचा आवाजही क्षीण होत चालला आहे. या खादी कापड निर्मिती केंद्रात 100 हून अधिक कामगारांच्या रोजगाराची क्षमता आहे. मात्र अगदी बोटावर मोजता येतील असे कामगार सध्या कार्यरत आहेत. नाविन्याचा अभाव आणि तज्ज्ञ कामगारांची वानवा यामुळे हे केंद्र अखेरच्या घटका मोजत आहे. तरीदेखील समाजानं खादी स्वीकारल्यास आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल अशी प्रतिक्रिया कामगार वर्ग व्यक्त करत आहे.
दुसरीकडे खादी केंद्र व्यवस्थापनाने मात्र सातत्याने मार्केटिंगचा आणि तज्ज्ञ कारागीर शोधण्याचा प्रयत्न करुनही खादी केंद्रात विणकर कारागिरांची कमतरताच राहिली. त्यामुळे येथील कापड निर्मिती उद्योग बंद झाली आहे. विणकरांच्या अभावामुळे येथील कापड निर्मिती प्रक्रिया बंद आहे. केवळ उत्तम दर्जाचा धागा तयार करून तो अन्य ठिकाणच्या खादी केंद्रात पाठवण्याचं काम येथे होत आहे. आगामी काळातही तज्ज्ञ विणकरांच्या कमतरतेने या केंद्रांना ‘अच्छे दिन’ येण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही.
प्रत्येक सरकारने मागील 70 वर्षे बापूंच्या आदर्शावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यासाठी आपल्या अब्जावधी रुपयांच्या योजना देखील कार्यान्वित झाल्या. मात्र स्वदेशी वस्तूंच्या प्रचारासाठी वाहिलेल्या केंद्रांना याचा कुठलाही फायदा झाला नाही. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खादीच्या प्रचार-प्रसारासाठी आणि बापूंच्या विचाराला बळकटी देण्यासाठी तरी सरकार ठोस निर्णय घेईल आणि या केंद्रांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देईल का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.