भारदस्त गाडी शेणाने सारवली, वधूपित्याकडून नवरीची अनोखी पाठवणी

| Updated on: Dec 13, 2019 | 11:31 AM

पेशाने डॉक्टर असलेले नवनाथ दुधाळ देशी गाईच्या शेणाच्या प्रसाराचं काम करतात. त्यामुळे शेणाच्या प्रचारासाठी पित्याने लेकीची पाठवणी शेणाने सारवलेल्या गाडीतून केली

भारदस्त गाडी शेणाने सारवली, वधूपित्याकडून नवरीची अनोखी पाठवणी
Follow us on

कोल्हापूर : फुलांनी सजवलेल्या गाडीतून आपली पाठवणी व्हावी, अशी प्रत्येक नवरीची इच्छा असते. मात्र कोल्हापुरात एका पित्याने आपल्या मुलीला सासरी पाठवण्यासाठी चक्क आपली गाडी शेणाने (Kolhapur Cow dung Car in Wedding) माखवली. डॉक्टर नवनाथ दुधाळ यांच्या या कल्पकतेमागील कारण समजण्यासाठी पाहुण्यांनाही वेळ लागला.

उस्मानाबाद इथल्या नवनाथ दुधाळ यांच्या मुलीचा लग्नसोहळा कोल्हापुरातील सोळंकी कुटुंबात झाला. लग्नाचा मांडव सजला, सनईचे सूर ऐकत नातेवाईक मांडवात येत होते. मात्र आत शिरताना चकाचक गाड्यांच्या बाजुला अनोख्या पद्धतीने सजलेली एक कार वऱ्हाडी मंडळींचं लक्ष वेधून घेत होती. शेणाने माखलेली ही गाडी लग्नाच्या मांडवात काय करतेय, हा प्रश्न त्यांना पडलेला. कुणी नाक मुरडलं, तर कुणी नाक मुठीत धरलं.

पेशाने डॉक्टर असलेले नवनाथ दुधाळ हे ‘पंचगव्य’च्या माध्यमातून देशी गाईच्या शेणाच्या प्रसाराचं काम करत आहेत. आपलं काम फक्त उपदेश देण्यापुरतं नाही, तर कृतीतूनही दिसलं पाहिजे हा त्यांचा आग्रह. म्हणूनच त्यांनी देशी गाईच्या शेणाने सारवलेली गाडी मांडवात आणून लावली.

लग्न ठरवत नसल्याने आईची मुलाकडून हत्या

कॅन्सरसारख्या अनेक भयानक आजारांनी माणसाच्या आयुष्याचा ताबा घेतला आहे. औषधांच्या अतिवापरामुळे जीवनमान कमी होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक रोगावर जालीम उपाय असणाऱ्या देशी गाईच्या शेणाचा प्रसार करण्याची संधी दुधाळ परिवाराने या निमित्ताने साधली.

इतर मुलींना फुलांनी सजलेल्या गाडीतून निरोप दिला जातो, पण शेणाने सजवलेल्या गाडीतून जाण्याचं भाग्य मला लाभल्याचं नववधू निकिता दुधाळ आनंदाने सांगते. औषधांविना निरोगी आयुष्य जगवण्याचं काम लग्नानंतरही करणार असल्याचा मानसही तिने बोलून दाखवला.

डॉ. दुधाळ आलिशान गाडीतून सजावटीसाठी लाखोंचा खर्च करुन मुलीची पाठवणी करु शकले असते. मात्र निरोगी आणि पर्यावरणपूरक आयुष्य जगण्याचा संदेश त्यांना देता आला नसता. शिवाय शेणाने सजवलेली कारसुद्धा (Kolhapur Cow dung Car in Wedding) किती सुंदर दिसते, हे पाहुणे मंडळीना सांगण्याची संधी त्यांना कधी मिळाली असती?