बळीराजावर अवकळा, अतिवृष्टीमुळे 10 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ

| Updated on: Nov 08, 2020 | 2:14 PM

आर्वी गावातील एका शेतकऱ्याला 10 एकरातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यावर ही अवकळा आली आहे.

बळीराजावर अवकळा, अतिवृष्टीमुळे 10 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ
Follow us on

वर्धा : अतीवृष्टीमुळे पिकांची नासधूस झाल्याने शेतकरी हतबल आहे. सोयाबीन पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. आर्वी गावातील एका शेतकऱ्याला तब्बल 10 एकरातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यावर ही अवकळा आली आहे. (loss of 10 acres soybean crop of arvi village farmer crop destroyed by tractor)

जिल्ह्यीतील आर्वी गावात श्रीकृष्णा दारोकर नावाचे शेतकरी शेती करतात. कमी कालावधित चांगले उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी 10 एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. दिवसरात्र काबाडकष्ट करुन त्यांनी चांगलं पीक उभं केलं. चांगला उतारा यावा म्हणून त्यासाठी फवारणी, खतपेरणीदेखील केली. त्यासाठी एकूण सव्वा लाख रुपयांचा खर्चही केला. मात्र, निसर्गाने ऐन वेळी धोका दिल्याने सोयाबीन पिकाची नासधूस झाली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आणि आर्वी परिसरात जोरदार पाऊस झाला. तसेच विविध रोगांचा प्रादुर्भावही सोयाबीनवर झाला. त्यामुळे दारोकर यांच्या हातचे पीक गेले; शेवटी उत्पन्नाची आणि नफ्याची हमीच नसल्याने त्यांना 10 एकर शेतातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागला. पण निसर्गाच्या अवकृपेने सगळं हिरावून नेलय. सोयाबीन काढून एकही रुपया मिळणार नसल्यान उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली.

जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये शेतकऱ्याला अतीवृष्टीचा सामना करावा लागला. पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 80 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. खरीप हंगामात एकूण 1 लाख 37 हजार 266 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. सुरुवातीला  पिकाची समाधानकारक वाढ झाली. पण ऐन वेळेवर पाऊस आणि रोगांच्या आक्रमणामुळे सोयाबीनची नासधूस झाली. अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील एकूण सोयाबीनपैकी 1 लाख 15 हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, शेतात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पन्नाचा दुसरा कुठलाही मार्ग नल्याने शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. सरकारने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

दिवाळी आली, तरीही कपाशी खरेदीला मुहूर्त मिळेना, वर्ध्यात कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल

मणिपूरचा प्रसिद्ध काळा तांदूळ धुळ्यात, अभिनव प्रयोगाने शेती फुलवली

अतिवृष्टीमुळे कीड लागल्याने हवालदिल शेतकऱ्यांची द्राक्ष बागांवर कुऱ्हाड; लाखो रुपयांचे नुकसान

(loss of 10 acres soybean crop of arvi village farmer crop destroyed by tractor)