उस्मानाबाद : ‘शिवसेना आणि भाजपच्या युतीचा वाद सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईन, हा वाद मिटवण्यासाठी मी प्रयत्न करेन’, असे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं. आमचा पक्ष छोटा असून शिवसेना-भाजप एकत्र आले तर फायदाच होईल, असा विश्वासही जानकरांनी व्यक्त केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील हंडोग्री गावात सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या भगवंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ या गोशाळेच्या पाहणीसाठी जानकर आले होते. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं.
युतीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
देशाच्या कल्याणासाठी आणि देश चोरांच्या हातात जाऊ नये यासाठी आम्हाला युती हवी आहे. पण भाजप लाचार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ज्यांना हिंदूत्त्व हवंय ते येतील, नाही आले तर आम्ही स्वबळावर लढू असा ईशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. ही अटल बिहारी वाजपेयी आणि मोदींची भाजपा आहे, ती कुणासमोरही लाचार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची सभा झाली, त्यावेळी मुंख्यमंत्री बोलत होते.
दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी रेल्वेने चारा पोहोचवणार-
दुष्काळग्रस्त भागात रेल्वेने पाणी पोहोचवल्यानंतर आता उस्मानाबादसह राज्यातील इतर दुष्काळी भागात जनावरांसाठी रेल्वेने चारा आणू, अशी ग्वाही महादेव जानकर यांनी दिली. पालघर, कोल्हापूर, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या भागातून दुष्काळग्रस्त उस्मानाबाद, बुलडाणा, औरंगाबाद, बीड आणि जालना या पाच जिल्ह्यांत हा चारा रेल्वेच्या मदतीने पोहोचवला जाईल, अशी माहिती जानकर यांनी दिली.
राज्यात जूनपर्यंत पुरेल इतका चारा सध्या शिल्लक आहे. मात्र, गरज पडल्यास तात्काळ रेल्वेने चार आणला जाईल. दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी सुरु करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले असून प्रत्येक मंडळ स्तरावर चारा छावणी सुरु करण्यात येईल. तहसीलदार, ग्रामसेवक आणि तलाठी यांचा पाहणी आणि चारा छावणी मागणी अहवाल आल्यास गाव पातळीवर देखील चारा छावणी सुरू केली जाणार असल्याचं जानकरांनी सांगितलं.