मुलगी व्हिलचेअरवर, तरीही लग्न केलं, शहीद शशीधरन यांची प्रेमकहाणी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

पुणे : 11 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटात मेजर शशीधरन नायर शहीद झाले. त्यानंतर यांना पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर मानवंदना देण्यात आली. यावेळी नायर यांच्या पत्नी तृप्ती शशीधरन नायर या देखील तेथे उपस्थित होत्या. शहीद नायर यांच्या पत्नी एका गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना आयुष्यभर व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागणार आहे. ही बाब माहित असूनही […]

मुलगी व्हिलचेअरवर, तरीही लग्न केलं, शहीद शशीधरन यांची प्रेमकहाणी
Follow us on

पुणे : 11 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटात मेजर शशीधरन नायर शहीद झाले. त्यानंतर यांना पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर मानवंदना देण्यात आली. यावेळी नायर यांच्या पत्नी तृप्ती शशीधरन नायर या देखील तेथे उपस्थित होत्या. शहीद नायर यांच्या पत्नी एका गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना आयुष्यभर व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागणार आहे. ही बाब माहित असूनही नायर यांनी तृप्ती यांच्याशी विवाह केला.

शहीद नायर आणि तृप्तींची प्रेम कहाणी-

लग्न ठरल्यानंतर तृप्ती पेंडा यांना मज्जारज्जूशी संबंधित गंभीर आजार आहे, ही बाब चाचण्यांमधून निष्पन्न झाली. सर्व आयुष्य त्यांना व्हिलचेअरवर खिळून राहावे लागेल, याचीही कल्पना डॉक्‍टरांनी दिली. मात्र शहीद मेजर शशीधरन नायर यांनी ठरलेलं लग्न न मोडता, त्यांच्याशीच विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याशी सुखाचा संसार केला. सर्व आघाड्यांवर त्यांना सांभाळून घेत, प्रेमाचा आधार दिला.

मेजर शशीधरन व तृप्ती यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. तृप्ती पेंडा या मूळच्या तेलुगू आहेत. लग्नापूर्वीपासून त्या पिंपरी-चिंचवड परिसरात राहतात. तेथील महाविद्यालयात त्यांनी संगणक अभियंत्याचे शिक्षण घेतले, तर मेजर शशीधरन हे मल्याळी आहेत. त्यांचे पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण झाले होते. लग्न ठरल्यानंतर दोघेही भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होते.

लग्नापूर्वी तृप्ती यांना मज्जारज्जूशी संबंधित आजार झाला. त्यामुळे त्यांना आयुष्यभर व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागणार होता. मात्र,, असे म्हणत मेजर शशीधरन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांचे लग्न झाले. लग्नाअगोदर व नंतरही त्यांनी तिच्यावर उपचार केले.

तृप्ती यांना दिव्यांगत्व आले. त्यामुळे त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे. शशीधरन सीमेवर तैनात असले तरी, तृप्ती यांच्यातील आत्मविश्‍वास जागविण्यासाठी ते नियमित विचारपूस करीत असत. त्यामुळे तृप्ती यांना मोठा मानसिक आधार मिळत असत.

शशीधरन देशासाठी हुतात्मा झाले आणि संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून गेले, याचं दुःख त्यांच्या पत्नीसाठी कायम राहणार आहे.

कोण होते मेजर शशीधरन नायर?

शहीद नायर हे मूळचे केरळचे रहिवासी होते. सध्या ते पुण्यातील खडकवासला परिसरात राहयचे. नायर यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. तर 2007 साली देहरादूनच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून त्यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले.

गेल्या 11 वर्षांपासून ते लष्करात कार्यरत होते. सध्या ते गोरखा रायफलच्या बटालियनमध्ये तैनात होते. 11 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्याप्रमाणेच पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी संभाळली होती.