सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांची प्रकृती खालावली, उपोषणाचा 9 वा दिवस

| Updated on: Sep 03, 2019 | 10:49 AM

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी नर्मदा धरणामुळे (Narmada Dam) विस्थापित झालेल्या मागण्यांसाठी 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण (Fast) सुरू केले आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाकडून अजून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांचं उपोषण सुरूच आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांची प्रकृती खालावली, उपोषणाचा 9 वा दिवस
Follow us on

भोपाळ (मध्य प्रदेश) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी सरदार सरोवर धरणामुळे (Sardar Sarovar Dam) विस्थापित झालेल्या मागण्यांसाठी 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण (Fast) सुरू केले आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाकडून अजून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांचं उपोषण सुरूच आहे. शनिवारी (1 सप्टेंबर) त्यांची प्रकृती खालावली. मात्र, त्यांनी पाणी पिण्यासही नकार दिला. मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) बडवानी जिल्ह्यात छोटा बड्डा गावात हे उपोषण सुरू आहे.

मेधा पाटकर (Medha Patkar) यांच्यासोबत त्यांचे शेकडो सहकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मेधा पाटकर यांच्यासह त्यांचे इतर 10 सहकारी देखील उपोषण करत आहेत. नर्मदा आमची जीवनदायिनी आहे आणि दिला मृत्यूदायिनी होऊ देणार नाही, असं मत या सहकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.  नर्मदा नदीवरील (Narmada River) धरणामुळे विस्थापित झालेल्या 32,000 लोकांच्या मागण्यांसाठी लढत आहेत. पाटकर यांच्या उपोषणानंतर जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत उपोषण सोडण्याचं आवाहन केलं. मात्र, मेधा पाटकर यांनी विस्थापित नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडण्यास नकार दिला.

अनेक गावं पाण्याखाली

नर्मदा नदीच्या पाण्याचा स्तर 134.5 मीटरपर्यंत वाढवल्यामुळे अनेक आदिवासी गावं पाण्याखाली गेली आहेत. घरं आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे. अशी 30,000 हून अधिक कुटुंबं पुनर्वसनाशिवाय आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मागील 34 वर्षांपासून ‘नर्मदा बचाओ आंदोलना’च्या (Narmada Bachao Andolan) माध्यमातून नर्मदा नदीवरील मोठ्या धरणांनी विस्थापित झालेल्या नागरिकांच्या न्याय-हक्कासाठी लढा देत आहेत. यातील सरदार सरोवर हे धरण सर्वात मोठे आहे. नर्मदा नदीवरील धरणांमुळे (Narmada Dam) नदी परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पाटकर यांनी धरणाची उंची वाढवण्यास सातत्याने विरोध केला आहे. ही उंची वाढवल्यास त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसेल. त्यामुळे अनेक कुटुंब विस्थापित होतील, उद्ध्वस्त होतील, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. धरणातील पाण्याचा स्तर वाढल्यानंतर त्याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळाला आहे.

मागील 35 वर्षांपासून नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील गावांची हत्या सुरू आहे. धरणामुळे वाढलेल्या पाण्यात अनेक गावं बुडाली आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अनेक गावांना बेटाचं रुप आलं आहे. त्यामुळेच विस्थापितांच्या हक्कासाठी आमचं आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत धरणामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचं योग्य पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहिल, असं मत उपोषणकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं आहे.

पुनर्वसनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन

धरणामुळं विस्थापितांचं पुनर्वसन अजून मोठ्या प्रमाणात बाकी आहे. जे झालं आहे त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पुर्नवसनाच्या (Rehabilitation) निकषांचेही पालन करण्यात आलेले नाही, अशी माहिती मेधा पाटकर यांनी दिली आहे.