गुजरातहून नंदुरबारमध्ये परतलेल्यांना मनेरगातंर्गत रोजगार, जिल्ह्यातील 40 हजार स्थलांतरित मजुरांच्या हाताला काम

| Updated on: May 23, 2020 | 4:22 PM

नंदुरबार जिल्ह्यातील 40 हजार स्थलांतरित आणि स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. (Nandurbar Migrant Workers work Under MGNREGA scheme)

गुजरातहून नंदुरबारमध्ये परतलेल्यांना मनेरगातंर्गत रोजगार, जिल्ह्यातील 40 हजार स्थलांतरित मजुरांच्या हाताला काम
Follow us on

नंदुरबार : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या मजूर परतीचा प्रवास करुन नंदुरबार जिल्ह्यात आपल्या गावी परतले आहे. पण गावी आल्यानंतर रोजगार नसल्याने पोट कसे भरावे? असा गंभीर प्रश्न त्यासमोर आवासून उभा होता. हतबल झालेल्या मजुरांना अशा बिकट परिस्थितीत नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मनरेगा योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 40 हजार स्थलांतरित आणि स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. (Nandurbar Migrant Workers work Under MGNREGA scheme)

या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पातून गाळ काढण्यात येत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. एक मजूर एका दिवसात 1 क्यूबेक मीटर गाळ काढतो. परिणामी 1 हजार लीटर पाणी साठवण क्षमता तयार होते. त्याशिवाय त्याच्या दुप्पट पाणीसाठा भूगर्भात वाढतो. सदर गाळ शेतात टाकल्याने जमीन सूपीक होऊन उत्पादन वाढीस निश्चित मदत होते. त्याच सोबत मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहेत.

विशेष म्हणजे हे मजूर तोंडाला मास्क लावून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन कर गाळ काढण्याचे काम करीत आहे. प्रत्येक कुटुंब लॉकडाऊन नियमावलीचे पालन करून नेमून दिलेले काम करीत आहे. या कामासाठी त्यांना प्रति दिवस 283 रूपये मजूरी दिली जात असून ती दर आठवड्याच्या अखेर थेट मजूरांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.

नंदुरबार जिल्ह्यात जॉब कार्ड धारकाची संख्या 3 लाख 6 हजार 539 एवढी असून 1 लाख 46 हजार 225 मजूर कामात कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 597 ग्रामपंचायत असून त्यातील 500 पेक्षा जास्त ग्रामपंचायत क्षेत्रातील मजुरांना मनरेगा योजना अंतर्गत काम मिळाले आहे. या योजनेतील काम दोन महिन्यांपर्यंत काम चालू राहिल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.

दरम्यान गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतरीत मजुरांमधील असंतोष कमी झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मजुरांना आर्थिक आवक होत असल्यामुळे शेतीकामासाठी निश्चितच मोलाची मदत होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मागेल त्याला काम मिळत असल्यामुळे कोरोना विषाणूची लागण होण्यास प्रतिबंध होऊ शकेल. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे. (Nandurbar Migrant Workers work Under MGNREGA scheme)

संबंधित बातम्या : 

मुंबई ते वर्धा पायपीट, गावी परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

पुण्यात धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल