नाशिक बस-रिक्षा अपघातात मंसुरी कुटुंबावर आघात, 8 जणांचा मृत्यू

| Updated on: Jan 29, 2020 | 5:03 PM

बस आणि रिक्षा एकमेकांवर धडकले आणि दोन्ही वाहनं 60 फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातात रिक्षातील सर्वच्या सर्व 9 जणांचाही मृत्यू झाला आहे.

नाशिक बस-रिक्षा अपघातात मंसुरी कुटुंबावर आघात, 8 जणांचा मृत्यू
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये मालेगाव देवळा मार्गावर बस आणि अॅपे रिक्षाच्या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहे. बस आणि रिक्षा एकमेकांवर धडकले आणि दोन्ही वाहनं 60 फूट खोल विहिरीत कोसळली (Nashik Bus – Rikshaw Accident). या अपघातात रिक्षातील सर्वच्या सर्व 9 जणांचाही मृत्यू झाला आहे. रिक्षामधील 8 जण एकाच परिवारातील होते, तर 1 रिक्षा चालक असे 9 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण गावसह मालेगाव तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्यातील 3 जणांचा दफनविधी, तर रिक्षा चालकाचा अंत्यविधी शोकाकुल वातावरणात येसगाव येथे करण्यात आला (Nashik Bus – Rikshaw Accident).

मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी अजीम मंसुरी हे आपल्या लहान मुलासाठी मुलगी बघण्यासाठी पत्नी हाजरा, मोठी मुलगी शाहीसता, लहान मुलगी शाहीन, जावई अन्सार, नातू जाहिद यांच्यासह नातेवाईक कुर्बान मंसुरी आणि फारुक मंसुरी यांना सोबत घेऊन रिक्षाचालक सकाळी 9 च्या सुमारास देवळाकडे निघाले. दुपारी परत येताना काळाने यांच्यावर घाला घातला.

अजीम मंसुरी यांची येसगावत 2 एकर शेती असून सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावाला धक्का बसला. या अपघात गावातील 25 वर्षीय रिक्षाचालक ज्ञानेश्वर सूर्यवंशीचाही मृत्यू झाला आहे. एकाच गावातील 9 जणांना अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बस आणि रिक्षाचा विचित्र अपघात

कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात होती. यादरम्यान, धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेल जवळ एसटी आणि रिक्षा या दोघांमध्ये जोरदार धडक झाली. बसचा टायर फुटल्याने बसने रिक्षाला धडक दिल्याची माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस आणि रिक्षा दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली.