वाशिममध्ये राष्ट्रवादीला खिंडार, दोन जिल्हाध्यक्षांसह शेकडोंचा भाजपात प्रवेश

| Updated on: Sep 08, 2019 | 4:12 PM

राज्यभरातील दिग्गजांच्या धक्कातंत्राने खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रसेला (NCP) मानोरा तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे

वाशिममध्ये राष्ट्रवादीला खिंडार, दोन जिल्हाध्यक्षांसह शेकडोंचा भाजपात प्रवेश
Follow us on

वाशिम : राज्यभरातील दिग्गजांच्या धक्कातंत्राने खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रसेला (NCP) मानोरा तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे (ncp Subhash Thakre) यांचे खंदे समर्थक उमेश पाटील आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ पाटील भोयर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी नुकतंच भाजपात (BJP) प्रवेश घेतला.

पक्षातील वाढती मक्तेदारी व हुकुमशाहीला कंटाळून भाजपात प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि ठाकरे पितापुत्रांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे या मतदारसंघात घडयाळाची टिकटिक मंदावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळणघळणीत महत्वाची भूमिका असलेले बिणीचे शिलेदार सद्यस्थितीत पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. राज्यातील हे लोण आता वाशिम जिल्ह्यातही पसरले आहे. राष्ट्रवादीत सुरु असलेल्या घराणेशाही व तुसडेपणाच्या वागणुकीला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते कंटाळले आहेत.

पक्ष व स्थानिक नेत्यांसाठी अहोरात्र मेहनत घेऊनही पदरी निराशा पडलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे खंदे समर्थक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ पाटील भोयर यांच्यासह तालुक्यातील बहुतांश जणांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विकासात्मक राजकारणाला साक्षी मानत या सर्वांवी पक्षात प्रवेश केला.

यामध्ये राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ पाटील भोयर, शेतकरी सुतगिरणी दारव्हाचे संचालक विठोबा पाटील, पंचायत समितीचे सदस्य गजानन भवाने, कुपट्याचे सरपंच रवि दिघडे, जवळ्याचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, कोलारचे माजी उपसरपंच विनोद पाटील, हिवरा बु. येथील सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य गोपाल पाटील व सचिन घोडे इत्यादींचा समावेश आहे.

एकेकाळी ठाकरे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू असलेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीसह माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासाठी हा मोठा हादरा मानल्या जात आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला याची किमंत मोजावी लागणार असल्याचीही चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.