9 झेडपी सदस्य, 73 सरपंचासह भास्कर जाधव शिवबंधनात अडकणार

| Updated on: Sep 09, 2019 | 3:56 PM

येत्या 13 सप्टेंबरला मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधव शिवबंधन (Bhaskar Jadhav Join Shivsena) बांधणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत जाणार आहेत.

9 झेडपी सदस्य, 73 सरपंचासह भास्कर जाधव शिवबंधनात अडकणार
Follow us on

गुहागर : विधानसभेपूर्वी (Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अनेक आमदारांनी सोडचिठ्ठी दिल्याने पक्ष खिळखिळा झाला आहे. रायगडचे राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते प्रमोद घोसाळकर, आमदार दिलीप सोपल यांसह अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. येत्या 13 सप्टेंबरला मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधव शिवबंधन (Bhaskar Jadhav Join Shivsena) बांधणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत जाणार आहेत. नुकतंच गुहागरमध्ये झालेल्या एका बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदारसंघात एका बैठकीचे आयोजन केले होते. यात त्यांनी 13 सप्टेंबरला शिवसेनेत जाणार असल्याची घोषणा केली.यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होती. माझ्यासोबत गुहागर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावप्रमुख वाडी प्रमुख आणि सरपंच हेदेखील (Bhaskar Jadhav Join Shivsena) प्रवेश करणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला कोकणात पुन्हा एकदा सर्वात मोठं भगदाड पडणार असल्याचं निश्चित झालंय.

विकास काय असतो हे गुहागर तालुक्यातील नागरिकांनी माझ्यामुळे अनुभवलं आहे. त्यामुळे मी जिथे जाईन, तिथे आम्ही असू असे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मला सांगितले. मी येत्या 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करेन. त्यावेळी माझ्यासोबत मतदारसंघातूल 9 जिल्हापरिषद सदस्य ही असतील. त्यांच्यासह गुहागर मतदार संघातील पंचायत सदस्य आणि 73 सरपंच माझ्यासोबत असतील असे भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले.

“विशेष म्हणजे गुहागरच्या राष्ट्रवादीची सर्व कार्यकारणीदेखील माझ्याबरोबर शिवसेनेत प्रवेश करेल”, असेही त्यांनी स्पष्ट केले. “तसेच जे निवडून आलेले प्रतिनिधी असतील त्यांच्यासाठी पुन्हा निवडणुका न घेता कसे सामावून घेतले जाईल. यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्यात येणार असल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत भास्कर जाधव?

1982 मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून पक्षात आले. 1995 ते 2004 या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदंही भूषवली. 2004 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता.

2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.

आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नऊ खाती सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांना सोपवण्यात आलं.