अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आणि आमदार रोहित पवार यांनी बिहार निवडणुकीच्या काळात बिहारमध्ये जाऊन तेथील रिक्षावाला, शिक्षक, युवक आणि सामान्य नागरिकांशी चर्चा केल्याचं सांगितलंय. तसेच यावेळी बिहारची निवडणूक जनतेने हातात घेतली असून तेथे मोठा बदल होऊन कुरघोडीचं राजकारण संपेल, असं मत व्यक्त केलंय. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते (NCP MLA Rohit Pawar comment on Bihar Election and his experience ).
रोहित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या काळात मी बिहारमध्ये गेलो होतो. बिहारमधील वातावरण काय आहे, परिस्थिती काय आहे आणि लोकांचा कल काय, त्यांचं म्हणणं काय हे समजून घेण्यासाठी मी व्यक्तिगत पातळीवर तेथे गेलो होतो. यंदा बिहारमधील निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर लढली जातेय. आतापर्यंत तेथे जातीपातीवर राजकारण होत होतं. मात्र, यंदा राष्ट्रीय जनता दलाकडून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाते आहे. त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ते पाहण्यासाठीच मी गेलो होतो.”
“बिहारमध्ये गेल्यानंतर लोकांशी बोललो, चर्चा केली. यात रिक्षावाला, शिक्षक, युवा आणि सर्वसामान्य लोकांशी मी बोललो. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपने या निवडणुकीत वेगळी खेळी खेळली. एलजेपीची जास्तीत जास्त लोकं जेडीयुच्या विरोधातच उभी केली. एलजेपीने भाजपविरोधात कोणताही उमेदवार दिला नाही. त्यामुळे एलजेपी ही भाजपची बी टीम असल्याचं लोकांचं मत होतं,” असंही रोहित पवार यांनी सांगितलं.
“भाजपला जास्त जागा याव्यात म्हणून एलजेपीची खेळी”
रोहित पवार बिहारच्या राजकीय डावपेचांवर बोलताना म्हटले, “जेडीयुच्या कमी जागा याव्यात आणि भाजपला जास्त जागा याव्यात म्हणून एलजेपीची खेळी करण्यात आली. यातून भाजप मोठा भाऊ होईल आणि सत्ता आल्यावर मुख्यमंत्री भाजपचा होईल यासाठी हे करण्यात आलं. मात्र, बिहारमध्ये वातावरण फार वेगळं आहे. तिथं सर्वसामान्य नागरिकांनी आणि युवकांनी निवडणूक ताब्यात घेतलीय.”
“आरजेडी विकास आणि नोकऱ्या या मुद्द्यांवर निवडणूक लढलंय. त्यांना नागरिकांचा प्रतिसाद देखील खूप चांगला मिळतो आहे. त्यामुळे तेथे बदल होईल अशी आशा करुयात. यातून कुरघोडीचं राजकारण थांबेल आणि बिहारमध्ये मोठा बदल दिसेल, असं लोकांशी चर्चा केल्यानंतर समजतंय,” असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमार यांना झटका, 63 टक्कांकडून सत्ता बदलाला पसंती
संबंधित व्हिडीओ :
NCP MLA Rohit Pawar comment on Bihar Election and his experience