जयपूर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका महिलेवर तिच्या पतीसमोरच सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपींनी महिलेच्या पतीला थानागाजी परिसरात बांधून ठेवत पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले.
आरोपींनी प्रथम महिलेच्या पतीला ज्युस पाजत बेशुद्ध केले आणि अज्ञात ठिकाणी बंद करुन ठेवले. त्यानंतर आरोपींनी महिलेवर सामुहिक बलात्कार केला. तसेच याविषयी कुणालाही सांगितले, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी महिलेचे अपहरण केले आणि तिला जयपूर येथे नेले. तेथेही महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. अखेर महिलेला तिच्या वडिलांनी सोडवले आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
‘पोलीस अधीक्षकांची हकालपट्टी’
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राजस्थान सरकारने अलवरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव पचार यांच्यावर बेजबाबदारपणाचा केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यासाठी अलवरच्या पोलीस अधीक्षक पदावरुन त्यांची हकालपट्टी केली आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव राजीव स्वरुप यांनी आज आदेश दिले. त्यामुळे पचार यांना पुढील आदेश येऊपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
‘निवडणूक असल्याने पोलीस अधीक्षकांनी प्रकरण दाबले’
निवडणूक असल्याने पोलीस अधीक्षक पचार यांनी हे सामुहिक बलात्कार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान याआधी थानागाजी पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनाही निलंबित करण्यात आले. राजस्थानचे पोलीस महासंचालक (डीजीपी) कपिल गर्ग यांनी हे निलंबनाचे आदेश दिले.
2 आरोपी गजाआड, 3 फरार
या गुन्ह्याप्रकरणी एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी कैलाश मीणा याला अटक केली. याआधी पोलिसांनी इंद्राज गुर्जर या आरोपीला अटक केली होती. अजूनही 3 आरोपी फरार आहेत.