कुटुंब नियोजनाचं ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ गाव, 97 वर्षांपासून लोकसंख्या सारखीच

| Updated on: Nov 16, 2019 | 2:54 PM

गेल्या 97 वर्षांपासून या गावाची लोकसंख्या स्थिर आहे. मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील धनोरा हे एक असं गाव आहे (Population growth is stable in Dhanora), ज्या गावाची लोकसंख्या 1922 मध्ये 1700 होती आणि ती आजही 1700 इतकीच आहे.

कुटुंब नियोजनाचं ब्रँड अ‍ॅम्बेसेडर गाव, 97 वर्षांपासून लोकसंख्या सारखीच
Follow us on

भोपाळ : लोकसंख्या वाढ ही वैश्विकस्तरावरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे (Population growth). मात्र, भारतातील एक छोटसं गाव या समस्येला अपवाद ठरलं आहे. कारण गेल्या 97 वर्षांपासून या गावाची लोकसंख्या स्थिर आहे. मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील धनोरा हे एक असं गाव आहे (Population growth is stable in Dhanora), ज्या गावाची लोकसंख्या 1922 मध्ये 1700 होती आणि ती आजही 1700 इतकीच आहे. याचं कारण म्हणजे या गावातील एकाही कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुलं नाहीत.

जगात ज्या काही समस्या आहेत, त्याचं एक मुख्य कारण लोकसंख्या वाढ असल्याचं मानलं जातं. कारण, सगळ्या देशातील, शहर आणि गावांतील लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र, त्या तुनलेत सुविधा आणि संसाधन हे मर्य़ादित आहेत. या परिस्थितीत धनोरा गाव जगासाठी कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ आहे, कारण इथली लोकसंख्या ही स्थिर आहे (Dhanora Village). धनोरा गावातील लोकसंख्या गेल्या 97 वर्षांपासून स्थिर आहे. म्हणजे या 97 वर्षांमध्ये इथली लोकसंख्या 1700 वरुन ना वाढली ना कमी झाली. आता हे शक्य कसं झालं? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर त्यामागची कहाणीही तितकीच रोचक आहे (Stable Population in Dhanora).

1922 मध्ये धनोरा गावात काँग्रेसचं एक सम्मेलन झालं होतं, या सम्मेलनासाठी कस्तुरबा गांधी आल्या होत्या. त्यांनी आनंदी जीवनासाठी ‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब’ ही घोषणा दिली होती. कस्तुरबा गांधींच्या या आवाहनाला धनोरा गावातील ग्रामस्थांनी काळ्या दगडावरची पांढरी रेष मानली. त्यामुळे या गावात दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन अवलंबलं जातं आणि गावातील लोकसंख्येत वाढ होत नाही.

गावातील वृद्ध सांगतात की, कस्तुरबा गांधी यांचा संदेश ग्रामस्थांनी अत्यंत गाभीर्याने घेतला, त्यामुळे 1922 नंतर या गावातील लोकसंख्या वाढलीच नाही. जवळपास सर्वच कुटुंबांनी एक किंवा दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजनाचा अवलंब केला. त्यामुळे गावातील लोकसंख्या स्थिरावू लागली. मुलांच्या लोभापायी कुटुंब वाढवण्याची कुप्रथाही इथल्या लोकांनी संपवली. आता इथे दोन मुली जन्माला आल्या, तरी देखील कुटुंब नियोजन केलं जातं.

कुटुंब नियोजनाच्या बाबतीत हे गाव एक मॉडेल झालं आहे. मुलगा असो किंवा मुलगी, दोन मुलांनंतर इथे कुटुंब नयोजनाचा अवलंब केला जातो. इथे लिंग गुणोत्तरही इतर ठिकाणांच्या तुलनेत चांगलं आहे. इतकंच नाही, तर मुलगा-मुलगीमध्ये फरक करणारी मानसिकताही येथे पाहायला मिळत नाही. धनोरा गावाच्या आसपास अशी अनेक गावं आहेत ज्यांची लोकसंख्या गेल्या 50 वर्षात चार-पाच पटीने वाढली आहे.

धनोरा गावातील ग्रामस्थांना कधीही कुटुंब नियोजनासाठी भाग पाडावे लागले नाही. ग्रामस्थांमध्ये याबाबतची जागरुकता असल्याने ते दोन मुलांनंतर स्वत:हून कुटुंब नियोजनाचा अवलंब करतात, असं गावातील आरोग्य कार्यकर्ता जगदीश सिंह परिहार यांनी सांगितलं.