पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन, नवी मुंबई महापालिकेच्या 160 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं काम बंद

| Updated on: Dec 17, 2019 | 4:11 PM

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशी डेपोमध्ये बांधण्यात आलेल्या 21 मजली टॉवरचं बांधकाम बंद करण्यात आलं आहे (Violation of Environmental rules).

पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन, नवी मुंबई महापालिकेच्या 160 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं काम बंद
Follow us on

मुंबई : पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशी डेपोमध्ये बांधण्यात आलेल्या 21 मजली टॉवरचं बांधकाम बंद करण्यात आलं आहे (Violation of Environmental rules). नवी मुंबई महापालिकेच्यावतीने वाशीतील डेपोच्या विकासाचं काम हाती घेण्यात आलं आहे. या ठिकाणी 21 मजली टॉवर उभारण्याचं नियोजित होतं. मात्र, या टॉवरची उंची पर्यावरण नियमांच्या आड येत असल्याने हे काम बंद करण्यात आलं (Violation of Environmental rules).

सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित इमारतीच्या कामामुळे पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याची तक्रार पर्यावरण आणि नगर विकास मंत्रालयाकडे केली. या संदर्भात तक्रारदारांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाशी डेपोच्या विकासाचे काम सुरु करण्यासाठी जुलैमध्ये कंत्राटदाराला ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली होती. मात्र, आत्ता हे काम बंद पडलं आहे. 2015 मध्ये पर्यावरण खात्याने ठाणे खाडीच्या 10 किमीपासूनचा परिसर ‘बफर झोन’ म्हणून घोषित केला. त्यामुळे त्याच्या आत येणाऱ्या बांधकामाच्या उंचीवर निर्बंध आले आहेत.

वाशी डेपोचा परिसर त्यातच येत असल्याने पर्यावरण विभागाकडून या कामाच्या परवानगीसाठी हिरवा कंदील मिळणं कठीण आहे. काम सुरु झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत ही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. पर्यावरण मंत्रालयातून फ्लेमिंगो क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र, हे क्षेत्र कमी होऊपर्यंत तरी या 160 कोटींच्या प्रकल्पाचे काम बंद असणार आहे. काम बंद झाल्याने प्रकल्पाची खर्च रक्कमही वाढणार आहे. हा सर्वसामान्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

या कामासाठी सल्लागार नेमण्यात आले आहेत. त्यांना या कामासाठी चांगला मोबदलाही दिला जातो आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यासाठी सल्लागारांनी त्यांची भूमिका योग्य प्रकारे निभावणे आवश्यक होते. मात्र, तसं न झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनर्जीत चौहान यांनी केला. तसेच दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी केली.