जीव देण्यात शेतकऱ्याला आनंद नाही, सरकारनं वेगळं धोरण घ्यावं : शरद पवार

| Updated on: Nov 01, 2019 | 9:39 PM

सरकारनं शेतकऱ्यांसाठी वेगळं धोरण घेतल्याशिवाय शेतकरी वाचणार नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Farmer Suicide) यांनी व्यक्त केलं.

जीव देण्यात शेतकऱ्याला आनंद नाही, सरकारनं वेगळं धोरण घ्यावं : शरद पवार
Follow us on

नाशिक: सरकारनं शेतकऱ्यांसाठी वेगळं धोरण घेतल्याशिवाय शेतकरी वाचणार नाही. शेतकऱ्यांना जीव देण्यात आनंद वाटत नाही. हे वेगळं धोरण घेतलं नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Farmer Suicide) यांनी व्यक्त केलं. ते आज (1 नोव्हेंबर) परतीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर होते.

शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना धीर सोडण्याचं आवाहनही केलं. पवार म्हणाले, “आपण संकटावर मात करू. शेतकऱ्यांनी धीर सोडू नका. सरकारशी बोलू, सगळं करू. पण मैदान सोडायचं नाही. मुला बाळाचा विचार करायचा आणि धीर धरायचा. तुम्ही धीर धरा, आम्ही सरकारशी बोलू.”

आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जाऊन येथील परिस्थितीची माहिती देणार आहोत. शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करणं गरजेचं आहे. यावेळी व्याजाची अपेक्षा करू नये. बँका आणि वीज मंडळांच्या वसुली थांबवाव्यात. केंद्र सरकारने याबाबत जी. आर. काढून सूचना दिल्या आहेत, असंही शरद पवारांनी नमूद केलं. तसेच सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करणार असल्याचंही सांगितलं.

सरकारी यंत्रणा दिवाळी संपल्यानंतर पंचनामे होतील असं सांगत आहे. मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत. जोपर्यंत दुसरा मुख्यमंत्री शपथ घेत नाही, तोपर्यंत या मुख्यमंत्र्याना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यांनी ठोस निर्णय घ्यावेत. सरकारने आणि त्यांच्या प्रतिनिधींनी या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे, असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवार म्हणाले, “नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्षाचं मोठं नुकसान झालं. मार्केटमध्ये लवकर माल आणण्यासाठी अनेकांनी लवकर छाटणी केली. पण अनेकांच्या हाताशी आलेला माल कुजला. अनेक ठिकाणी द्राक्ष बागा जळून गेल्या. मराठवाड्यात देखील खूप नुकसान झालं आहे. सांगली सोलापूरमधील पूरग्रस्त भागात उसाचं पीक उध्वस्त झालं आहे. मोठी गुंतवणूक केल्यानंतर होणारं नुकसानही मोठं असतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाच मोठं ओझं होतं आणि तो शेतकरी हवालदिल होतो.”

“माझी स्वतःची साडेतीन एकर बाग, मी डाळिंब लावणं सोडलं”

शरद पवार यांनी त्यांच्या शेतीच्या अनुभवांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “कांद्याचं, डाळिंबाचं या पावसानं मोठं नुकसान झालं आहे. माझी स्वतःची साडेतीन एकर बाग आहे. मात्र, मी देखील डाळिंब लावणं सोडून दिलं आहे. या पावसात मका, बाजरी, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या स्थितीमधून मार्ग काढावा लागेल. नवं सरकार कधी येईल माहिती नाही. सरकार आलं, तर ठीक आहे, नाही तर केंद्र सरकारला याबाबत सांगावं लागेल.”