देशभरात कोरोनाशी सामना, मध्य प्रदेशात सत्तापालट, शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्रिपदी

| Updated on: Mar 23, 2020 | 10:56 PM

मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर मध्य प्रदेशमध्ये सत्तापालट झाले आहे (Shivraj Singh Chauhan become MP CM). भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

देशभरात कोरोनाशी सामना, मध्य प्रदेशात सत्तापालट, शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्रिपदी
Follow us on

भोपाळ: मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर मध्य प्रदेशमध्ये सत्तापालट झाले आहे (Shivraj Singh Chauhan become MP CM). भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सरकारची सूत्रं हाती येताच शिवराज सिंह चौहान यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच आपलं पहिलं प्राधान्य कोरोना नियंत्रणाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजभवन येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते थेट वल्लभ भवन येथे पोहचले. तेथे त्यांनी राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मध्य प्रदेशमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये सध्या कोरोनाने नुकतंच डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये त्यावर नियंत्रणासाठी प्रयत्न केलं जात आहे. शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेल्या आपल्या पहिल्या ट्विटमध्ये सर्वात आधी कोरोनाशी लढायचं असल्याचं सांगितलं.


मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले, “तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. आता माझं सर्वात प्रथम प्राधान्य हे कोरोना संसर्गाचा सामना करण्याला असणार आहे. बाकी सर्व नंतर पाहिले जाईल.”

सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार : कमलनाथ


काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान यांचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केलं. कमलनाथ यांनी ट्विट करत म्हटलं, “मध्य प्रदेशचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. त्यांचं खूप खूप अभिनंदन. काँग्रेस सरकारने घेतलेल्या जनहिताचे निर्णय, कामं आणि योजना हे नवं सरकार पुढे चालू ठेवील ही आशा आहे. आजपासून आम्ही एक सकारात्मक विरोधीपक्षाची भूमिका पार पाडू. आम्ही नव्या सरकारच्या लोकहिताच्या कामांना आणि निर्णयांना पूर्ण पाठिंबा देऊ. तसेच सरकारच्या प्रत्येक कामावर आणि निर्णयावर लक्ष ठेऊ. जर राजकीय द्वेषापोटी राज्याच्या हितासाठी, लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेली कोणतीही योजना बंद करण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही ते सहन करणार नाही. त्याचा जनतेसोबत मिळून योग्य मंचावर विरोध करु.”

Shivraj Singh Chauhan become MP CM