जेवणापासून घरातल्या प्रकाशापर्यंत, ‘या’ गावात केवळ सौरऊर्जेचाच वापर

| Updated on: Jun 07, 2019 | 4:49 PM

विशेष म्हणजे आता या गावात इडंक्शनवर जेवण बनवण्यापासून घरातील वीजेपर्यंतची सर्व काम सौरऊर्जेद्वारे केली जातात. त्यामुळे हे देशातील पहिले सौरऊर्जेवर चालणारं गाव ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जेवणापासून घरातल्या प्रकाशापर्यंत, या गावात केवळ सौरऊर्जेचाच वापर
Follow us on

भोपाळ (मध्य प्रदेश) : मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाशाची उपलब्धता असूनही आपल्याकडे सौरऊर्जेचा फार कमी उपयोग केला जातो. मात्र मध्यप्रदेशातील बांचा गावात वीजेपासून जेवणापर्यंत सर्व काम सौरऊर्जेचा वापर करुनच होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे बांचा हे देशातील पहिले संपूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करणारं गाव ठरलं आहे.

देशात अनेक ठिकाणी अनियमितपणे वीज पुरवठा केला जातो. यामुळे वीजेच्या भारनियमनचा फटका सध्या सर्वांना बसत आहे. अशाच प्रकारची समस्या काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील बांचा गावात  होती. बांचा गावात वीजेच्या नियमित पुरवठ्यासाठी गावकऱ्यांनी गावात सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केंद्र सरकार आणि मुंबई आयआयटीच्या  एकत्रित सौरऊर्जा प्रकल्पद्वारे या गावात 74 घरांजवळ सोलार पॅनल बसवण्यात आले. या सोलार पॅनलचा उपयोग कसा करायचे हेही लोकांना समजून सांगण्यात आले. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये संपूर्ण गावात सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात आला.

या प्रकल्पामुळे गावात आता सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्यात येते. विशेष म्हणजे आता या गावात इडंक्शनवर जेवण बनवण्यापासून घरातील वीजेपर्यंतची सर्व काम सौरऊर्जेद्वारे केली जातात. त्यामुळे हे देशातील पहिले सौरऊर्जेवर चालणारं गाव ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या गावाच्या प्रकल्पाचे मॉडेल आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. “सौरऊर्जेद्वारे चालणाऱ्या इलेक्ट्रीक चुलीसाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 80 हजार रुपये खर्च आला. मात्र त्यानंतर अनेकांनी इलेक्ट्रीक चूल गावात बसवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता केवळ 35 ते 40 हजार रुपये खर्च प्रत्येक चुलीमागे आल्याचं या प्रकल्पाचे मॅनेजर पवन कुमार यांनी सांगितले.” या चुलीद्वारे पाच लोकांसाठी तीन वेळा जेवण, चहा, नाश्ता सर्व काही बनवता येतं असल्याचं त्यांनी सांगितलं

गावात सौरऊर्जा प्रकल्प राबवल्यामुळे गावकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. यामुळे आता गावात कोणालाही चूलीसाठी लाकडे जमा करावी लागतं नाही. त्यामुळे जंगलात झांडाची होणारी कत्तल थांबली आहे, असं मत गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केलं.

“सोलार चूलीमुळे भांडी काळी पडत नाहीत. त्यामुळे आमचा भांडी घासण्यासाठीचे श्रम आणि वेळ दोन्ही वाचतो. तसेच चूलीमुळे डोळ्यात धूर जातो. त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. मात्र सोलार चूलीमुळे कोणत्याही प्रकारचा धूर निर्माण होत नाही. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य नीट राहते, ” असे मत या ठिकाणच्या महिलांनी व्यक्त केलं.