रत्नागिरी : आपल्याकडे माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांना देखील कुटुंबाचा सदस्य समजलं जातं. त्यांच्यावरही त्या कुटुंबातील सदस्यांचा तितकाच जीव असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, रत्नागिरीतील चिखली गावात कुत्र्याच्या प्रामाणिकपणाची आणि कर्तव्यदक्षतेप्रति कृतज्ञता दाखवत थेट देव म्हणून पूजा केली जाते (Temple of a Dog in Ratnagiri). या कुत्र्याला येथील लोक ‘बाल्या’ या नावाने हाक मारत. या कुत्र्याने ग्रामस्थांसह, त्यांची जनावरे आणि घरांचंही रक्षण केल्याचं गावकरी सांगतात.
चिखली गावातील चांदीवडे वाडीत हा देव कुत्रा होता. दर वर्षी 1 जानेवारीला या वस्तीतील लोक संपूर्ण दिवस त्याच्या स्मरणात एकत्र येतात आणि त्याच्या शौर्याचे गोडवे गातात. चिपळूणहून गुहागरला जाताना चिखली गावातील रस्त्याच्या लगत येथील ग्रामस्थांनी सामूहिकरित्या बाल्या कुत्र्याचं मंदिर देखील बांधलं. त्यात बाल्याच्या चांदीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलीय. चांदीवडे वाडीतील ग्रामस्थ नियमितपणे या मंदिरातील मूर्तीची न चुकता नियमित पूजा करतात.
बाल्या कुत्र्याची कथा
1990 च्या दरम्यान जेव्हा गावाच्या भोवती घनदाट जंगल होतं त्यावेळी बाल्या गावातील जनावरांसह येथील ग्रामस्थांचं जंगली हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करायचा, अशी माहिती येथील जाणकार सांगतात. एखाद्या सिनेमात जसा गळ्यात सामानाची यादी टाकली की कुत्रा वाणसामान घरपोच करतो. त्याप्रमाणे बाल्या चांदीवडे परिवारातील लोकांचं साहित्य आणून देत असे. शिवाय रात्रीच्या वेळी संपूर्ण वाडी निद्रिस्त असताना बाल्या मात्र खडा पहारा देत असे, असंही सांगितलं जातंय.
एखाद्या प्राण्याचं मंदिर अथवा त्याचं स्मरण करण्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. चिखली गावातील ही परंपरा देखील त्यापैकीच एक आहे. विशेष म्हणजे आजचा तरुण वर्ग देखील बाल्या कुत्र्याचं स्मरण करून नव्या वर्षाची सुरवात करण्याची परंपरा जपताना दिसत आहे.