कडकनाथ घोटाळ्यात पैसे अडकले, वडिलांकडून आत्महत्येची भाषा, तिसरीच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Jan 22, 2020 | 4:55 PM

तिसरीत शिकणाऱ्या एका मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं (student letter to cm on Kadaknath scam) आहे. धनश्री आश्रुबा बिक्कड असे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव आहे.

कडकनाथ घोटाळ्यात पैसे अडकले, वडिलांकडून आत्महत्येची भाषा, तिसरीच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

उस्मानाबाद : कडकनाथ कोंबडी घोटाळ्याने वडिलांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. वडील नेहमी आत्महत्येची भाषा करत असतात, अशी व्यथा मांडणारे पत्र तिसरीत शिकणाऱ्या एका मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं (student letter to cm on Kadaknath scam) आहे. धनश्री आश्रुबा बिक्कड असे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव आहे.

धनश्रीने लिहिलेले पत्र

माझे नाव धनश्री आशुबा बिक्कड आहे. मी तिसरी वर्गात जि. प्रा. शाळा देवळाली ता. कळंब येथे शिकत आहे. साहेब माझे पप्पा शेतकरी आहेत. पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्या वेळेला पाऊसच नसतो. मग शेतात काहीच धान उगवत नाही. माझे पप्पा नेहमी टेन्शनमध्ये असतात. सारखे चिडचिड करतात. मम्मीवर रागवतात. माझ्यावर पण चिडतात. त्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो. त्या कडकनाथ घोटाळ्याने वाटोळं केलं. कडकनाथ कोंबड्याच्या घोटाळ्यात लय पैसे अडकले. नेहमी मेलेलं बरं. मरणाशिवाय आता दुसरा पर्यायच नाही. अस सारख बोलतात. मला घाबरायला होते. मला फार भिती वाटते.

आमच्या शाळेत पेपर येतो. त्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बातम्या येतात. आमच्या पप्पाला समजून घ्या. तुम्ही समजून सांगा. त्यांना त्या कडकनाथ कोंबड्यासाठी दिलेले पैसे परत मिळवून द्या. प्लीज माझ्या पप्पाला मदत करा.

आमच्या सरांनी सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांना 26 जानेवारीनिमित्त शुभेच्छा पाठवा. म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहिले.

काळी कोंबडी, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी अशी कडकनाथ कोंबडीची ओळख… त्याचे मांस आणि अंडे महाग असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबडी संगोपनाचा व्यवसाय सुरु केला. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली येथील आश्रुबा बिक्कड यांची एका कंपनीने 4 लाखांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे उद्धवस्त झाले.

दुष्काळी परिस्थितीत त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरला. कंपनीने त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी बिक्कड यांनी इस्लामपूर आणि मुंबईत आंदोलन केले. अनेक लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली. मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही. सध्या आश्रुबा आणि त्यांचे कुटुंब तणावाखाली (student letter to cm on Kadaknath scam) आहे.

आश्रुबा यांची फसवणूक झाल्याने ते नेहमी तणावाखाली असतात. घरात चिडचिड तणावाचे वातावरण असल्याने त्यांची मुलगी धनश्री चिंताग्रस्त असते.

धनश्रीच्या शाळेत 26 जानेवारी निमित्त शुभेच्छा पत्रांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात धनश्रीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. वडील नेहमी आत्महत्येची भाषा करतात. मला याची भिती वाटते. त्यामुळे वडिलांना मदत करण्याची आर्त हाक धनश्रीने मुख्यमंत्र्यांना दिली.

धनश्रीने पत्रात मांडलेली व्यथा आणि विदारक वास्तव तिच्या शिक्षकांनी वाचलं. हे पत्र वाचल्यानंतर तिच्या शिक्षकांनी घरी फोन केला. त्यांनी तिच्या वडिलांना आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला.

कडकनाथ कोंबडी व्यवसायाच्या प्रकरणात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली. याबाबत सरकारने त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज (student letter to cm on Kadaknath scam) आहे.