गरम कपडे घालावे की रेनकोट, पावसामुळे संभ्रम, राज्यभरात अवकाळी

| Updated on: Jan 02, 2020 | 11:48 AM

मुसळधार पावसामुळे नागपूरकर पुरते हैराण झाले आहेत. या सततच्या पावसामुळे थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घालावे की रेनकोट घालावा अशा संभ्रमात सध्या नागपूरकर आहेत.

गरम कपडे घालावे की रेनकोट, पावसामुळे संभ्रम, राज्यभरात अवकाळी
Follow us on

नागपूर : आधीच थंडीने गारठलेल्या नागपुरात सध्या पाऊस ठाण मांडून बसला आहे (UnSeasonal rain). नागपुरात सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुसळधार पावसामुळे नागपूरकर पुरते हैराण झाले आहेत. या सततच्या पावसामुळे थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घालावे की रेनकोट घालावा अशा संभ्रमात सध्या नागपूरकर आहेत. नागपूरसोबतच विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात मुसळधार पाऊस सुरु आहे. नागपूरकरांचं नवीन वर्ष पावसापासूनच सुरु झालं. या पावसामुळे नागपूरकरांना नवीन वर्षाचं स्वागतही करता आलं नाही, अनेकांच्या थर्टी फर्स्टच्या योजनांवरही या पावसामुळे पाणी फिरले गेले. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे, अनेक ठिकाणी गारपीटही झाली. पावसामुळे हवेतील गारवाही वाढला आहे. त्यामुळे नागपूरकरांना थंडीसोबतच आता पावसाचाही सामना करावा लागत आहे.

नागपुरात चांगलीच थंडी वाढल्याने नागरिक गरम कपडे घालून घराबाहेर पडत होते. मात्र, आज गरम कपड्यांऐवजी रेनकोट बाहेर काढावे लागले. सकाळ पासून पावसाची संततधार सुरू असल्याने कामावर किंवा कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. नागपूरसह विदर्भातील अनेक भागात कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने थंडीतही वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरकर भर हिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव घेत असले, तरी हा पाऊस आरोग्यासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता आहे.

नागपुरातच नाही तर काटोल, सावनेर, नरखेडमध्येही गारापीट झाली आहे. तिवासा सह नागपूरमधील काही शहरांमध्ये आज सकाळी सोसाट्याच्या वार्‍यासह काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान या पावसामुळे कापूस, सोयाबीन, गहू, संत्र यांचे नुकसान झालं आहे.

पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, शेतकरी पुन्हा अडचणीत

दुसरीकडे, महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. ऐन जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा पारा महाराष्ट्रात सर्वत्र खालावत असताना नागपूरसोबतच अमरावती, वाशिम, नांदेड, हिंगोलीसह विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच परतीच्या पावसाने हवालदील झालेला शेतकरी आता पुन्हा अडचणीत आला आहे. पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे संत्रा, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांना फटका बसला आहे.

नांदेडमध्येही पाऊस, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांच्या हातून हे पीक जाते की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असून कधी तरीच सूर्यदर्शन घडत आहे. या ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा, गहू आणि करडई या पिकांवर मोठा परिणाम झाला असून अगोदरच ही पिके पिवळी पडून करपत आहेत. आज नांदेड शहरासह अनेक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाने जसा खरीप हंगाम हातचा हिरावून घेतला, तसा रब्बी हंगामही हिरावून घेतो की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावतेय.

अमरावतीत गारपीट

अमरावती जिल्ह्यात सर्वत्र गारपीटीसह जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला आहे.

वर्ध्यातही पावसाची हजेरी,  कापूस भिजला, चण्याच्या पिकाचंही नुकसान

वर्ध्यातही रात्रभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे कापूस भिजून मोठं नुकसान झालं आहे. तर चण्याच्या पिकाचंही नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 31 डिसेंबर 2019 ला विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद वर्ध्यामध्ये झाली होती.

UnSeasonal rain in Maharashtra