खाणार काय? भाजीपाल्यांचे भाव गगनाला; दिवाळीपर्यंत महागाईची फोडणी कायम राहणार?

| Updated on: Oct 17, 2020 | 3:14 PM

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मुंबईत भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. (vegetable price hike in Mumbai)

खाणार काय? भाजीपाल्यांचे भाव गगनाला; दिवाळीपर्यंत महागाईची फोडणी कायम राहणार?
Follow us on

नवी मुंबई :  परतीच्या पावसाने सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी हतबल झाल्याचा पाहायला मिळतोय. अतिवृष्टीमुळे ( heavy rains) शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी राज्यभर भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. मुंबईच्या घाऊक बाजारात वाटाणा 150 रुपये प्रतिकिलो तर कांदा 60 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. घाऊक बाजारात भाजीपाल्याची किंमत वाढल्यामुळे पर्यायाने किरळोळ बाजारतही भाजीपाल्यांचे भाव कडाडणार असल्याचे म्हटले जात आहे. (vegetable price hike in Mumbai due to heavy rains across the state)

राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे सत्र सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे विक्रीसाठी मालाची आवकदेखील कमी झाली आहे. याचाच परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला असून घाऊक बाजारात कांदा, मिरची तसेच इतर भाजीपाल्याची आवक घटली आहे. पाच दिवसांपूर्वी घाऊक बाजारात कांदा 35 ते 50 रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. किरकोळ बाजारात त्याची किंमत 60 रुपये प्रतिकिलो होती. पण, आता घाऊक बाजारात कांद्याचा भाव वाढला असून तो 60 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. कांद्याची भाववाढ अशीच राहीली तर आगामी काळात कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे. तसेच ही दरवाढ दिवाळीपर्यंत अशीच सुरु राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणाामी सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर

सध्या भाजीपाल्याचे भाव काय ?

अतीवृष्टीमुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली. मुंबई बाजार समितीमध्ये दररोज 400 ते 500 वाहनं भाजीपाला विक्रीसाठी  येत असतात. पण अतिवृष्टीमुळे दिवसभरात फक्त 373 गाड्यांची आवक होत आहे. सध्या नवी मुंबईत घाऊक बाजारात कोबी 40, कारली 40, मिरची 70 ते 80, शिमला मिरची 70 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. तर भेंडी 50, गवार 65, टोमॅटो 35, वाटाणा 150 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय.

संबंधित बातम्या : 

Marathwada Rain | मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान

“पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री अतिवृष्टीचा आढावा घेणार”

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव, तब्बल 44जणांनी जीव गमावला

(vegetable price hike in Mumbai due to heavy rains across the state)