नागपूर : ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात शेतकरी भरडला जातोय, शरद पवार विदर्भातील कापूस उत्पादकांवर अन्याय करत आहेत’ असं टीकास्त्र ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कापूस खरेदी केंद्र विजयादशमीपासून सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारचे कापूस खरेदी केंद्र 1 डिसेंबरपासून तर केंद्राचे कापूस खरेदी केंद्र 10 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहेत. शेतकऱ्यांना कापूस हमीभावापेक्षा कमी भावानं विकावा लागत आहे, त्यामुळं दु:ख होतंय, असं विजय जावंधिया म्हणाले. (Vijay Jawandhia said Sharad Pawar did injustice with Vidarbha Farmers)
विदर्भात आधीच बोंडअळीमुळे कापसाचं 60 ते 70 टक्के नुकसान झालंय. या संकटातून थोडाफार कापूस हातात आला. सरकारी खरेदी सुरु न झाल्याने, त्या कापसाला अवघा 4300 प्रती क्विंटलपासून दर मिळतोय. कापसाचा हमीभाव 5820 असताना सरकारी खरेदी सुरु न झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे, असा आरोप ज्येष्ठ कृषीज्ज्ञ विजय जावंधिया यांनी केला.
बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव
माणसांवर कोरोना महामारीचं संकट तर शेतातील पिकांवर यंदा कीड आणि रोगाची महामारी आलीय. विदर्भातील शेतकऱ्यांवर एकामागोमाग येणाऱ्या संकटांच्या मालिकेला सामोरं जावं लागत आहे. कीड रोगांमुळे यंदा विदर्भातील ८० टक्के सोयाबीन हातातून गेलं आहे. आता बोंडअळीमुळे 60 ते 70 टक्के कपाशीचं पीकही शेतकऱ्यांच्या हातून गेलंय. बोंडअळीपासून सरंक्षण करणाऱ्या बीटी बियाण्याची लागवड केली असताना प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
कपाशीचं बीटी बियाणं असतानाही बोंडळअचं आक्रमण झाल्याने, अनेक प्रश्न उपस्थित झालेत कारण बोंडअळीपासून कपाशीचं संरक्षण करण्याचं काम बीटीचं तंत्रज्ञान करत असते. मग, बीटी कपाशीवर बोंड अळीचं आक्रमण झाल्याने, बोंडअळीचा प्रभाव संपला का?, अशी चर्चा आता सुरु झालीय.
बोंडअळीमुळे विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं एकरी 25 ते 30 हजार रुपयांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. विदर्भात आधीच सोयाबीनचं पीक गेल्यानं शेतकरी संकटात आहेत, त्यात आता कापसावर बोंडअळीचं आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं गेलंय.
बोंडअळीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशीचं पीक काढायला सुरुवात केलीय. बीटी कपाशीवर बोंडअळी येत असेल, तर मग भविष्यात कपाशी लागवड कशी करायची, हा प्रश्नंही शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. बोंडअळीने कपाशीचं पीक गेल्याने शेतकरी हवालदील झालेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर सर्व्हे करुन, नकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते करतायत.
संबंधित बातम्या :
दिवाळी आली, तरीही कपाशी खरेदीला मुहूर्त मिळेना, वर्ध्यात कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल
(Vijay Jawandhia said Sharad Pawar did injustice with Vidarbha Farmers)