भागवत कथेदरम्यान शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात

| Updated on: Jan 27, 2020 | 10:17 PM

अडचणीला सामोरे जात असलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देत थेट भागवत कथेतील रुक्मिणी स्वयंवरात शेतकरी कुटुंबातील मुलीचं लग्न लावण्यात आलं.

भागवत कथेदरम्यान शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात
Follow us on

वर्धा : लग्नसोहळा म्हटलं की मोठा ताम झाम, बक्कळ खर्च, मग त्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढायचं असंच काहीसं चित्र असतं. पण परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना लग्न सोहळे आवाक्याबाहेर होत आहेत (Farmers Daughter Wedding). अशाच अडचणीला सामोरे जात असलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देत थेट भागवत कथेतील रुक्मिणी स्वयंवरात शेतकरी कुटुंबातील मुलीचं लग्न लावण्यात आलं (Farmers Daughter Wedding).

वर्ध्याच्या धोत्रा इथल्या सद्गुरु परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांती धाम इथे हा विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी महाराज पुण्यतिथी महोत्सव, स्वर्गीय विमल गुल्हाणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे 21 जानेवारीपासून भागवत सप्ताह आयोजित आला आहे. या भागवत कथेत शेतकरी कुटुंबातील मुलामुलीचं लग्न धडाक्यात लावण्यात आलं. धोत्रा इथल्या संतोष राऊत यांची मुलगी संगिताचा विवाह अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील एकलासपूर इथल्या विनायक भोयर यांचा मुलगा रवी भोयरसोबत झाला.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात सतत दुष्काळ आहे. त्यातच डोक्यावरील कर्ज आणि नापिकीमुळे शेतकरी पुरता निराश झाला आहे. नापिकीमुळे आर्थिक चणचण आणि बिकट परिस्थिती असल्याने धोत्रा येथील संतोष राऊत यांना मुलीचा लग्न सोहळा कसा करावा असा मोठा प्रश्न उभा राहिला होता. कृष्णगिरी परिवाराने ही गोष्ट ऐकून मदतीचा निर्णय घेतला आणि भागवत कथेदरम्यान शेतकरी कुटुंबील दाम्पत्याचं धुमधडाक्यात लग्न लावलं.

शेतकरी सध्या अडचणीत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. अडचणीतील शेतकर्‍यांना मदत व्हावी, असा मानस असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन समितीच्या सदस्यांनी केलं. कुटुंबाला अडचणीच्यावेळी मदत मिळाली. हा उपक्रम शेतकरी परिवारात आंनद निर्माण करणारा ठरला. या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केलं.