अर्धांगवायू/लकवा म्हणजे काय? तो होऊ नये म्हणून काय करावं?

| Updated on: Aug 30, 2019 | 9:37 AM

अर्धांगवायू होतो म्हणजे शरीराच्या आत नेमकं काय होत? अर्धांगवायू होऊ नये म्हणून काय करायला हवं? आपल्या जीवनशैलीमध्ये कोणते छोटे छोटे बदल करावे? याबद्दल सजग असणं ही काळाची गरज आहे.

अर्धांगवायू/लकवा म्हणजे काय? तो होऊ नये म्हणून काय करावं?
Follow us on

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत अनेक आजार आता आपलं डोकं वर काढत आहेत. यातील काही आजार तर असे आहेत ज्यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांना फारशी माहितीही नाही. असाच एक आजार म्हणजे अर्धांगवायू/लकवा (Paralysis). अर्धांगवायूसोबतच रक्तदाब (Blood Pressure-BP), साखर (Sugar) हे केवळ शहरी आजार राहिले नसून हे आजार आता ग्रामीण भागासह आदिवासी भागात देखील मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.

अर्धांगवायू (Paralysis) होतो म्हणजे शरीराच्या आत नेमकं काय होत? अर्धांगवायू होऊ नये म्हणून काय करायला हवं? आपल्या जीवनशैलीमध्ये कोणते छोटे छोटे बदल करावे? याबद्दल सजग असणं ही काळाची गरज आहे. म्हणूनच गडचिरोलीतील आदिवासी भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) आणि डॉ. राणी बंग (Dr. Rani Bang) यांच्या संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांची संस्था ‘ग्रामीण आरोग्य सेवा शिक्षण व संशोधन संस्था (SEARCH), टाटा सेंटर ऑर टेक्नॉलॉजी आणि डिझाईन (TCTD) आणि आय. आय. टी. मुंबई (IIT Mumbai) यांनी यावर उपाय सुचवणारा जनजागृतीपर व्हिडीओ तयार केला आहे. यात वरील सर्व प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार अर्धांगवायूचा त्रास हा प्रामुख्याने मेंदूचा आजार आहे. ह्रदयातून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अतिरक्तदाबामुळे फुटल्या किंवा शरिरातील चरबीमुळे बंद झाल्या की मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो. अशावेळी रक्तपुरवठा बंद झालेला मेंदूचा भाग निकामी होऊन त्याचा संपूर्ण शरिराच्या कार्यावर घातक परिणाम होतो. शरिराचा संबंधित भागाला काही प्रमाणात अपंगत्व येते. यालाच वैद्यकीय भाषेत अर्धांगवायू म्हणतात.

अर्धांगवायूचा त्रास होऊ नये म्हणून दैनंदिन जगण्यात काय करावे?

1. दररोज कमीत कमी 30 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करावा
2. जेवणात अजिबात वरुन मीठ घेऊ नये
3. दररोज कमीत कमी एक तरी फळ खावं
4. जेवणात दररोज एक तरी हिरवी भाजी खावी
5. कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन करु नये
6. अजिबात दारू पिऊ नये

वाढलेल्या वयासोबत आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवतात. त्यामुळे अशास्थितीत आजारांचं शरिरावरील आक्रमण अधिक वेगानं होतं. म्हणूनच वरील गोष्टीसह अन्य काही गोष्टी करणे देखील आवश्यक आहे. त्यानुसार नियमित रक्तदाब (Blood Pressure-BP) तपासायला हवा. जर रक्तदाबाचा त्रास असेल तर त्याचं रुपांतर अर्धांगवायूमध्ये होण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच अशावेळी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित न चुकता, न विसरता वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे रक्तदाबावरील औषधे घ्यावीत.

लकवा मारण्याचा धोका कमी करण्यासाठी काय करावं?

1. नियमितपणे शरिरातील साखरेचं प्रमाण तपासावं
2. साखरेचा त्रास आढळ्यास त्याला नियंत्रित करणारी औषधे नियमितपणे घ्यावीत

जर एखाद्या रुग्णाला अर्धांगवायूचा त्रास आधी झाला असेल तर त्यांनी पुन्हा होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे हा धोका कमी करणारी औषधे नियमित घेणे अत्यावश्यक आहे.

VIDEO 

संबंधित बातम्या :

धुम्रपानच नाही, तर लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो : सर्व्हे

वजन कमी करण्यासाठी किती ग्रीन टी प्यायला हवी?

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?